पैशाने नव्हे, तर प्रेमाने माणसे जोडल्याचा मला सार्थ अभिमान;

भाजप उमेदवार विक्रांत विकासभाई सावंत यांचे प्रतिपादन

सावंतवाडी दि.०४: “आमच्या कुटुंबाला तीन पिढ्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे नेताना मी राजकारणाकडे कधीही पैसा कमावण्याचे साधन म्हणून पाहिले नाही. निवडणुकीच्या रिंगणात मी पारदर्शकतेचा आदर्श घेऊन उतरलो असून, पैशाने नव्हे तर प्रेमाने माणसे जोडता येतात, याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे परखड मत जिल्हा परिषद उमेदवार विक्रांत सावंत यांनी व्यक्त केले.

विक्रांत सावंत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या राजकीय भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीवर नाव न घेता निशाणा साधला.

वारसा प्रामाणिक सेवेचा
सावंत म्हणाले की, त्यांच्या कुटुंबाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक दशके प्रामाणिकपणे काम केले आहे. याच संस्कारांच्या शिदोरीवर ते जनतेसमोर जात आहेत. “राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे, संपत्ती गोळा करण्याचा अड्डा नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

स्वच्छ आणि पारदर्शक राजकारणाचा संकल्प
निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या पैशांचा व वशिल्याचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. यावर भाष्य करताना सावंत म्हणाले:

“मी निवडणुकीच्या मैदानात पारदर्शक आणि स्वच्छ राजकारणाचा आदर्श लोकांसमोर ठेवण्यासाठी उतरलो आहे. काळे धंदे, गैरमार्ग किंवा पैशांच्या जोरावर राजकारण करण्याचा माझा कोणताही विचार नाही. जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास हीच माझी खरी कमाई आहे.”

जनतेच्या प्रेमावर विश्वास
“माणसे पैशाने विकत घेता येतात हा काहींचा भ्रम असू शकतो, मात्र प्रेमाने जोडलेली माणसे कायम सोबत राहतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून विक्रांत सावंत यांनी मतदारांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here