वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शाळकरी मुलांचा जीव टांगणीला
सावंतवाडी दि.१४: निरवडे-बाईतवाडी मार्गावर वनविभागाच्या जुनाट निर्गुडी (निलगिरी) जातीच्या झाडाची भलीमोठी फांदी विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात विद्युत वाहिन्या तुटण्याबरोबरच शेजारील आंब्याच्या झाडाचेही नुकसान झाले. सुदैवाने, याच वेळी शाळेतून घरी परतणारी मुले थोडक्यात बचावली असून मोठी जीवितहानी टळली आहे.
आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. निरवडे-बाईतवाडी मार्गावर वनविभागाच्या मालकीची अनेक जुनाट आणि धोकादायक झाडे आहेत. त्यातील एका मोठ्या झाडाची फांदी अचानक वीज वाहिन्यांवर पडली. फांदीचा भार सहन न झाल्याने विद्युत वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या. याच मार्गावरून शाळकरी मुले जात होती, मात्र नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.
वनविभागाचा हलगर्जीपणा चर्चेत
या मार्गावर सध्या सुमारे १२ निर्गुडीची झाडे अत्यंत धोकादायक आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. ही झाडे तत्काळ तोडण्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार लेखी विनंत्या केल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ टाळाटाळ केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पालकांचा आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे भाईवाडी, मल्हारवाडी आणि बाईतवाडी भागातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याची वेळीच दखल न घेतल्यास संतप्त पालक वनविभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील.
शाळकरी मुलांना सोबत घेऊन सावंतवाडी वनविभाग कार्यालयावर थेट आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
“अधिकारी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का? आमच्या मुलांच्या जीवाशी खेळ थांबवा आणि ती धोकादायक झाडे तात्काळ हटवा,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563