सिंधुदुर्ग दि.०६(प्रतिनिधी): जिल्ह्यातील आयनल (ता. कणकवली) येथील ३८ वर्षीय शिक्षणसेवक प्रशांत गंगाराम तांबे यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मात्र, या निधनाने शिक्षणसेवक या पदाच्या नावाखाली सुरू असलेल्या शोषणाचा आणि व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “जिवंतपणी संघर्ष आणि मृत्यूनंतर उपेक्षा” अशीच काहीशी अवस्था आज शिक्षणसेवकांची झाली आहे.
संघर्ष, जिद्द आणि नियतीचा निर्दयी खेळ महाळुंगे राणेवाडी (ता. देवगड) येथील शाळेत कार्यरत असलेले प्रशांत तांबे हे अत्यंत प्रामाणिक आणि प्रेमळ स्वभावाचे शिक्षक होते. तब्बल १४ वर्षे नोकरीसाठी संघर्ष केल्यानंतर ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून त्यांची शिक्षक म्हणून निवड झाली होती. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील पॅरालिसिसने अंथरुणाला खिळलेले, आई सतत आजारी, तर पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका कपड्यांच्या दुकानात काम करत होती. अशा परिस्थितीत तांबे हे कुटुंबाचा एकमेव आधार होते.
उपचारादरम्यान मृत्यू आणि व्यवस्थेचे अपयश २८ मार्च रोजी ओरोस येथील शैक्षणिक महोत्सवातून परतल्यानंतर त्यांना ताप आणि चक्कर येऊ लागली. प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीपोटी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी गोवा येथे नेत असताना, ४ एप्रिल रोजी दुपारी रुग्णवाहिकेतच त्यांची प्राणज्योत मालवली. तांबे यांची नियमित सेवा सुरू होण्यासाठी केवळ एक वर्ष शिल्लक होते, मात्र नियतीने त्यापूर्वीच घाला घातला.
तुटपुंजे मानधन आणि शून्य संरक्षण प्रशांत तांबे यांना शिक्षणसेवक म्हणून केवळ १५,७९९ रुपये मानधन मिळत होते. आज त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार उघड्यावर आला आहे. शिक्षणसेवक कालावधीत कोणतेही सेवा संरक्षण नसल्याने, त्यांच्या कुटुंबाला ना शासनाची मदत मिळणार, ना अनुकंपा तत्त्वावर नोकरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणसेवकाच्या मृत्यूची ही पाचवी घटना आहे, तरीही शासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने शिक्षक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
प्रमुख मागण्या:
शिक्षणसेवक पद तात्काळ रद्द करून शिक्षकांना नियमित सेवा द्यावी.
किमान बेसिक वेतन आणि सर्व सेवा संरक्षण लागू करावे.
मृत शिक्षणसेवकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व अनुकंपा नोकरी द्यावी.
चौकट
“शिक्षणसेवक हा देखील शिक्षकच आहे, मग त्याला मिळणारी वागणूक दुय्यम का? प्रशांत तांबे यांच्यासारखा प्रामाणिक शिक्षक जातो, पण त्याच्या कुटुंबासाठी शासनाकडे कोणतीही ठोस तरतूद नाही, ही अत्यंत वेदनादायक आणि संवेदनशून्य बाब आहे. शिक्षणसेवक ही संकल्पना आता संपवण्याची वेळ आली आहे. शासनाने आता तरी जागे होऊन ठोस निर्णय घ्यावा.” — जावेद तांबोळी (प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती)


