पालकमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय; सिंधुदुर्गातील ९० शाळांना मोठा दिलासा! दुर्गम भागातील शाळांसाठी विशेष सवलत: २० विद्यार्थी संख्या असूनही ३ शिक्षकांना मिळणार मंजुरी

सावंतवाडी दि.१४: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांसमोर उभे राहिलेले शिक्षकांच्या कमतरतेचे मोठे संकट पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष पुढाकारामुळे टळले आहे. इयत्ता ९ वी आणि १० वीच्या वर्गांसाठी केवळ २० विद्यार्थी संख्या असतानाही ३ शिक्षकांना मंजुरी देण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्र्यांनी शासनाकडून मंजूर करून आणला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ९० शाळांना जीवदान मिळाले असून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.
‘संच मान्यते’च्या जाचक अटींतून जिल्ह्याला सवलत
‘संच मान्यता २०२४’ च्या नवीन नियमांमुळे कमी पटसंख्या असलेल्या अनेक ग्रामीण शाळांमधील शिक्षकांची पदे धोक्यात आली होती. यामुळे दुर्गम भागातील शाळा शिक्षकांविना ‘पोरक्या’ होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, पालकमंत्री नितेश राणे यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक वर्षाची विशेष सवलत मिळवून दिली आहे.
शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी उचलले पाऊल
राज्यात प्रथम क्रमांक: सिंधुदुर्ग जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच आपला दबदबा राखला आहे. २०२५ च्या निकालात ९९.३२% गुणांसह जिल्हा राज्यात प्रथम आला होता.
निकालाची परंपरा: हाच यशाचा आलेख कायम राखण्यासाठी शिक्षकांची पदे रिक्त न ठेवण्याचा निर्णय अत्यंत कळीचा ठरणार आहे.
“ग्रामीण व दुर्गम भागातील शाळा शिक्षकांविना बंद पडण्याची भीती होती. मात्र पालकमंत्र्यांनी तत्परतेने दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.” — डॉ. दिनेश नागवेकर, उपाध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ.

शिक्षण प्रसारक मंडळाकडून कृतज्ञता व्यक्त
या निर्णयाबद्दल सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांनी पालकमंत्र्यांचे जाहीर आभार मानले आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी प्रत्यक्ष पालकमंत्र्यांची भेट घेऊन पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या या संवेदनशील निर्णयामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here