
सातार्डा दि.२४: सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथील निवृत्त माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे आज (रविवार, २४ मे) दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. देशसेवा आणि समाजसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या या ज्येष्ठ सैनिकाच्या निधनाने सातार्डा परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. ते ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार व इंजिनिअर जयराम (बाळा) पवार यांचे वडील होत.
१९७१ च्या युद्धातील सहभाग आणि ३२ वर्षांची देशसेवा
हवालदार चंद्रकांत पवार हे अगदी लहान वयातच भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. त्यांनी सैन्यदलाच्या ‘एएससी’ (आर्मी सव्हिर्स कोर) मध्ये हवालदार पदावर तब्बल ३२ वर्षे प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवा बजावली. विशेष म्हणजे, १९७१ च्या ऐतिहासिक भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सैन्यदलाचा त्यांना प्रचंड अभिमान होता.
एसटी महामंडळात १५ वर्षे चालक म्हणून सेवा
सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांची सेवावृत्ती थांबली नाही. त्यांनी राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) ‘एसटी बस चालक’ म्हणून १५ वर्षे यशस्वी सेवा केली. या काळात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागीय कार्यालयांतर्गत (DC Office) देवगड, मालवण, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले डेपोत कर्तव्यदक्ष चालक म्हणून काम केले होते.
देशभक्तीचा कडक शिस्तीचा आदर्श
सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्यातील सैनिक कायम जागृत होता. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ते सातार्डा ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला न चुकता उपस्थित राहत. सैन्यात असताना जवान आणि अधिकारी ज्याप्रमाणे आपल्या बेल्टला व शूजला पॉलिश करत, कडक इस्त्रीचा युनिफॉर्म घालत; अगदी त्याच उत्साहात आणि शिस्तीत ते सैनिकी गणवेश परिधान करून ध्वजाला कडक सॅल्यूट ठोकण्यासाठी जात असत. त्यांचा हा उत्साह तरुण पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला.
समाजसेवेसाठी सदैव तत्पर
सार्वजनिक कार्यात आणि समाजसेवेत ते नेहमीच अग्रभागी असायचे. गावातील सार्वजनिक रस्ता मंजूर व्हावा आणि त्याचे काम व्हावे, यासाठी थेट उपोषण आंदोलन करण्याची तयारीही त्यांनी दाखविली होती.
सोमवारी सकाळी ११:३० वाजता अंत्यसंस्कार
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
स्व. चंद्रकांत पवार यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सातार्डा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता त्यांच्या मूळ गावी सातार्डा येथील ‘तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत’ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563




