🚨 महावितरणचा मनमानी कारभार! भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सासुरवाडीलाही विजेचा तीव्र फटका; सावंतवाडीतील १५-१६ गावांची कोंडी! 🚨

🚨 🚨सावंतवाडी दि.०६: सावंतवाडी तालुक्यातील वीज पुरवठ्याचा प्रश्न आता राजकीयदृष्ट्या कमालीचा तापला असून, यामध्ये आता ‘नेमळे’ गाव केंद्रस्थानी आले आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांचे हे सासुरवाडीचे गाव, तर सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक हेही याच गावचे सुपुत्र! असे असूनही हे गाव विजेसाठी आजही वेंगुर्ला तालुक्याशी जोडलेले असल्याने ग्रामस्थांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. गाव सावंतवाडीत आणि वीज पुरवठा वेंगुर्ल्यातून, अशा विचित्र प्रशासकीय व्यवस्थेमुळे नेमळे, आजगाव, भोमवाडी, मळेवाड, कोंडुरे, सातार्डा, सातोसे, आरोस, पाडलोस अशा १५ ते १६ गावांची पुरती कोंडी झाली आहे.
याविरोधात ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी मळेवाड येथील गणपती मंदिरात महावितरणच्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी देण्यासाठी भजन करत उपरोधिक आंदोलनही छेडले होते, मात्र तरीही महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांना अद्याप जाग आलेली नाही.
💸 १५-१६ गावांना वेंगुर्ल्याचा नाहक भुर्दंड आणि दुहेरी फटका!
भौगोलिकदृष्ट्या ही गावे सावंतवाडीत असूनही वीज तक्रारींसाठी ग्राहकांना मुद्दाम वेंगुर्ला मुख्यालय किंवा रेडी येथील कार्यालयात जावे लागते. महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना या प्रवासासाठी नाहक वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. ही गावे तातडीने सावंतवाडी वीज कार्यालयाला जोडावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
📉 कमी दाबाचा पुरवठा; विद्युत उपकरणे निकामी!
सातार्डा, साटेली, मळेवाड, कोंडुरा भागात दर अर्ध्या-एक तासाने वीज गायब होणे ही ‘परंपराच’ बनली आहे. काल शुक्रवार (५ जून) रोजी रात्री तर तास-तासभर वीज खंडित होत होती. त्यातच अत्यंत कमी दाबाने (लो व्होल्टेज) वीज पुरवली जात असल्याने सततच्या ‘फ्लक्चुएशन’मुळे नागरिकांची महागडी विद्युत उपकरणे निकामी होत आहेत. कडक उन्हाळ्याच्या उकाड्याने ग्रामीण जनता हैराण झाली असताना, वायरमन मात्र “१५ मिनिटांत वीज येईल” अशी खोटी आश्वासने देऊन नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.
📌 सावंतवाडी पंचायत समितीत वेंगुर्ला महावितरणचे अभियंता का नाहीत?
पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा अशा सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहून लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे देतात. सावंतवाडी वीज महावितरणचे अधिकारीही या बैठकीला येतात. मात्र, सावंतवाडी तालुक्यातीलच १५ ते १६ गावे जोडलेल्या वेंगुर्ला वीज महावितरणच्या उपअभियंत्यांना या बैठकीचे निमंत्रण का दिले जात नाही? त्यांनाही या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत रितसर पत्रव्यवहार करून उपकृत करण्याची गरज आता व्यक्त होत आहे.
वादळ नसतानाही वीज गुल; महावितरणचे स्पष्टीकरण शून्य!
सध्या परिसरात किरकोळ अवकाळी पाऊस सुरू असला, तरी कोणत्याही वादळी वाऱ्याचा प्रादुर्भाव नसतानाही महावितरणकडून वीज पुरवठा तासनतास खंडित केला जातो. यावर महावितरण कंपनीकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिले जात नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.
आमदार रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कोणताही प्रश्न चुटकीसरशी सोडवण्याची राजकीय क्षमता असताना, महावितरणच्या या जाचक त्रासातून हक्काच्या मतदारांची मुक्तता का केली जात नाही? असा रोकडा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here