मानवतेचा हात !

राजू मसुरकर यांच्या पाठपुराव्यामुळे दोघांना ‘संजय गांधी निराधार योजने’चा लाभ

सावंतवाडी दि.२९: समाजातील गरजू आणि दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. सावंतवाडी येथील शुभांगी वसंत गवंडी आणि सुवर्ण कारागीर नितीन कारेकर या दोघांनाही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आता दरमहा २,५०० रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.

उभा बाजार येथील रहिवासी आणि कष्टकरी सुवर्ण कारागीर नितीन कारेकर हे दिव्यांगत्वामुळे अडचणीत होते. त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वात मोठी अडचण ‘अपंगत्वाचा अधिकृत दाखला’ मिळवणे ही होती. श्री. राजू मसुरकर यांनी केवळ मार्गदर्शन न करता, स्वतःच्या खासगी वाहनाने कारेकर यांना जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे आवश्यक सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांना अधिकृत दाखला मिळवून दिला.

दाखला मिळाल्यानंतर तहसीलदार कार्यालयात रीतसर अर्ज सादर करण्यापासून ते मदत मंजूर होईपर्यंत मसुरकर यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या संवेदनशील प्रयत्नांमुळेच:शुभांगी वसंत गवंडी (रा. वैश्य वाडा) यांना दरमहा २,५०० रुपयांचे अर्थसहाय्य सुरू झाले आहे.नितीन कारेकर (उभा बाजार) यांनाही या योजनेचा लाभ मिळून त्यांच्या जीवनाला आर्थिक आधार प्राप्त झाला आहे.राजू मसुरकर यांनी दाखवलेली ही तत्परता आणि मानवतावादी दृष्टिकोन पाहून सावंतवाडी परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. सामान्य नागरिकांना शासकीय योजनांच्या चक्रव्यूहातून बाहेर काढून प्रत्यक्ष लाभ मिळवून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात असून, लाभार्थ्यांनी व नागरिकांनी मसुरकर यांचे आभार मानले आहेत.

“नितीन कारेकर हे अत्यंत कष्टाळू आणि सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना हक्काची शासकीय मदत मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलता आला, याचे समाधान आहे.” — राजू मसुरकर, अध्यक्ष – जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here