आई कुणा म्हणू मी! मायेचा अथांग सागर आणि कष्टांची शिदोरी

भावपूर्ण श्रद्धांजली !

आई, तू अशी अचानक अनाथ करून निघून जाशील असं कधीच वाटलं नव्हतं. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी नियती आणि दैवापुढे कोणाचं काही चालत नाही, याची प्रचिती आज तुझ्या जाण्याने येत आहे.

हा देह केवळ रक्त-मांसाचा गोळा नाही, तर तू दिलेली चेतना, संस्कार आणि भावनांचा ठेवा आहे. तू घेतलेल्या कष्टांचं आणि प्रेमाचं कर्ज या जन्मात काय, पण पुढच्या अनेक जन्मांतही फिटणं शक्य नाही. आई, तुझ्याशिवाय जीवनाची कल्पना करणंही कठीण आहे. तुझे शब्द आणि तुझी शिकवण आजही माझ्या अंगाखांद्यावर खेळत आहेत. “माझा ‘विजय’ हा तुझा अभिमान ! मी सार्थ केला काय?” – या माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच तू लहानपणीच्या लपाछुपीसारखी कायमची दडून बसलीस.निघून गेलीस !!

कष्टांची पहाट आणि रानावनातील सोबत

आई, तुझ्या आठवणी येतात त्या तुझ्या अपार कष्टांच्या. बाबा सीमेवर देशाचं रक्षण करत असताना तू घर आणि मुलं दोन्ही सांभाळलंस. आई तू ‘बाबा’ ही झालीस. पहाटेच्या साखरझोपेत मी असायचो, तेव्हा तू डोईवर लाकडाचा भारा घेऊन भटवाडी किंवा पेळपीच्या जंगलातून घरी यायचीस. तुझ्या हातात माझ्यासाठी असलेला रानमेवा, ती करवंदं आणि घसोळी आजही डोळ्यांसमोर आहेत.

१९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी तुझ्या डोळ्यातली ती भीती आणि आसवांची धार मला आजही आठवते. रेडिओवरच्या बातम्या ऐकताना ‘शेकडो सैनिक धारातीर्थी पडले’ असं ऐकलं की तुझ्या काळजाचा ठोका चुकायचा. बाबांची चिंता आणि आमचं संगोपन अशा दुहेरी कात्रीत तू स्वतःला झिजवलंस.

एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात तिचा जन्म झाला इन्दुमती हे तिचे माहेरचे नाव,त्याकाळची सातवीपर्यंत शिक्षण तिचे झालेले होते म्हणून ती आम्हा मुलांना शाळेत जा शिकून मोठे व्हा असे नेहमी सांगत असे.आम्ही कमी शिकलो तुम्ही तरी शिका असे नेहमी सांगत असे.आजोबा महादेव,आजी द्वारका,गजानन व एकनाथ मामा,मामी,शांती मावशी यामुळे शनिवार रविवार माझा मुक्काम मामाच्या मळेवाड गावी असे. बऱ्याचदा आमच्या सोबत आई असे.तेव्हाही तिचे अपार कष्ट पाहिले.

संस्कारांची शिदोरी आणि यशाची वाट

शाळेत जाण्याचा आळस केला की तुझा धाक आणि बाबू काकांचा वचक असायचा. छडी घेऊन शाळेत पोहोचवणारा बाबू काका आणि डबा करून देणारी तू, यामुळेच मी अभ्यासात प्रगती करू शकलो. सावंतवाडीच्या ‘श्री पंचम खेमराज’ महाविद्यालयात जाताना पहाटे सहाची बस पकडण्यासाठी तू केलेली धडपड आजही काळजाला स्पर्श करते. घरची परिस्थिती बेताची असतानाही मळेवाडच्या मामा-आजोबांच्या सोबतीने तू आमचं विश्व समृद्ध केलंस.

शेवटचा निरोप आणि न विझणारी आठवण

आयुष्यात स्थैर्य आलं, घर-संसार सुखाचा झाला, पण तुझ्या मायेची सावली कायम असावी असं वाटत होतं. नव्या घरात तुझा वावर हवा होता, काही काळ राहिलीस ही, पण तुझ्या अर्धांगवायूच्या झटक्याने सर्व काही बदललं. उपजिल्हा रुग्णालय, रेडी येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि शेवटी गोवा मणीपाल… आम्ही आशा सोडली नव्हती. तू बरी होऊन घरी येशील असं वाटत होतं. हॉस्पिटलमध्ये असतानाही तुला तुझी काळजी नव्हती, तर “बाबांची काळजी घ्या, त्यांना वेळेवर जेवण द्या,” हेच तुझे शब्द होते. तुझ्या ७९ व्या वर्षी, एकसष्ठाव्या लग्नाच्या वाढदिवसानंतर नियतीने तुला हिरावून नेलं.

“आई तुझं लेकरू, वेडं गं कोकरू, रानात फसलयं, रस्ता चुकलंय, सांग मी काय करू?”

‘विजय’: एका नावाचा विलक्षण प्रवास

प्रत्येकाच्या नावामागे काहीतरी गोष्ट असते, पण माझ्या नावाचा इतिहास थेट देशाच्या सीमेवरच्या कर्तव्याशी आणि खेळाच्या मैदानावरील विजयाशी जोडलेला आहे. माझ्या जन्माचा तो दिवस केवळ माझ्या कुटुंबासाठीच नाही, तर एका अभिमानास्पद विजयासाठीही लक्षात राहणारा ठरला.

वारसा आणि परंपरेचा कौल

माझा जन्म झाला तेव्हा घरात आनंदाचे वातावरण होते. आजी आणि आई सोबत होत्या, पण बाबा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात होते. जुन्या पद्धतीच्या कुटुंबामध्ये थोरल्यांचा शब्द प्रमाण मानला जाई. त्यानुसार, आजीच्या आग्रहाखातर माझे नाव पूर्वजांच्या आठवणीत ‘हरिश्चंद्र’ ठेवण्याचे निश्चित झाले. ‘हरिश्चंद्र’ – जे नाव सत्य आणि निष्ठेचे प्रतीक मानले जाते, तेच आता माझ्या आयुष्याची ओळख बनणार होते.

मैदानावरील पराक्रम आणि नवा वळण

मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच दिवशी, माझे तिसऱ्या क्रमांकाचे काका—ज्यांना आम्ही ‘आबा काका’ म्हणतो—जे सैन्य दलात इंजिनिअरिंग विभागात कार्यरत होते, ते एका मोठ्या बॉक्सिंग स्पर्धेत लढत होते. २ मार्चचा तो दिवस! इकडे माझा जन्म झाला आणि तिकडे आबा काकांनी रिंगण गाजवून गोल्ड मेडल (सुवर्णपदक) पटकावले.

त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर निर्भेळ ‘विजय’ मिळवला होता. आपल्या पुतण्याच्या जन्माची गोड बातमी आणि स्वतःचा पराक्रम यांचा हा अनोखा संगम पाहून त्यांनी मनाशी एक निश्चय केला.

पत्राने धाडलेला संदेश

त्या काळात आजच्यासारखे मोबाईल नव्हते. आबा काकांनी पत्राद्वारे कळवले की, “या मुलाने माझ्या आयुष्यात विजयाची बातमी आणली आहे, त्यामुळे त्याचे नाव ‘विजय’ ठेवावे.”एका बाजूला आजीचा परंपरेचा आग्रह होता आणि दुसरीकडे सैनिकाने रणांगणासारख्या बॉक्सिंग स्पर्धेतून मिळवलेला गौरव! अखेर सुवर्णमध्य साधला गेला. कागदोपत्री माझे नाव ‘हरिश्चंद्र’ लागले, जे माझ्या कुळाची परंपरा जपतं, पण घराघरात आणि मित्रमंडळीत मी ‘विजय’ म्हणूनच ओळखला जाऊ लागलो.

आज मागे वळून पाहताना वाटतं, माझं नाव केवळ एका व्यक्तीची ओळख नाही, तर तो माझ्या काकांच्या कष्टाचा, त्यांच्या सुवर्णपदकाचा आणि आमच्या कुटुंबाच्या लष्करी बाण्याचा एक जिवंत दस्तऐवज आहे. एकाच वेळी दोन नावं मिरवताना मला नेहमीच ‘सत्य’ आणि ‘विजय’ या दोन्ही मूल्यांची जाणीव होत राहते.

चिमणी आणि तिचे घरटे: मायेचा एकच रंग

आईच्या निधनानंतर सातार्डा गावी असताना घरासमोरच्या एका झाडावर एका चिमणीचं घरटं दिसलं. ती चिमणी आपल्या पिल्लांना चोचीने खाऊ घालत होती, त्यांच्यावर लक्ष ठेवत होती आणि कोणी शत्रू पक्षी आला की त्यावर तुटून पडत होती. ते दृश्य पाहून जाणीव झाली की, सृष्टीतील प्रत्येक मातेचं हृदय एकसारखंच असतं. मग ती चिमणी असो वा माझी आई. पिल्लांसाठी धडपडणारी ती चिमणी पाहून आईच्या वात्सल्याची पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवण आली.

आई, तू जरी देहाने आमच्यात नसलीस, तरी तुझ्या संस्कारांच्या रूपाने तू सदैव आमच्या मनात जिवंत राहशील.असेच म्हणावे लागेल.

🌸 आई… तू आणि तुझी ही गोकुळासारखी संपदा! 

आई, लोक म्हणतात श्रीमंती पैशात असते, पण आज जेव्हा आम्ही तुझ्या भोवती पसरलेलं हे आमचं विस्तीर्ण कुटुंब पाहतो, तेव्हा जाणवतं की खरी श्रीमंती तर तू कमावलेली ही ‘माणसांची संपदा’ आहे. एका वटवृक्षाप्रमाणे तू आपल्या कुटुंबाला मायेची सावली दिलीस आणि तुझ्याच संस्कारांच्या मुळावर आज हे आमचं ‘गोकुळ’ डोलत आहे.

तुझा संसार आणि तुझी माऊली माया: बाबा (माजी सैनिक चंद्रकांत) यांच्या सोबतीने तू संसाराचा गाडा ओढला आणि आज तुझे मुलगे हरिश्चंद्र व जयराम, सुना अनुराधा व प्रणिता तुझ्या शब्दाखातर उभ्या आहेत. तुझ्या मुली – सुनिता, मंगल, मनिषा आणि तेजस्विनी – यांच्या रूपाने तू घराघरात संस्कारांचे दीप लावले आहेस.

नात्यांची गुंफण आणि एकजूट: तुझ्या या मोठ्या परिवारात तुझे दीर काशिनाथ व शांताराम आणि त्यांच्या सहचारिणी प्रभावती,श्यामल तसेच कुसुम, राधाबाई, व अर्चना या सर्व जाऊबाईंच्या साथीने तू घराचं घरपण टिकवून ठेवलंस.

तुझी पुतण्या-पुतणी आणि भाच्यांची फौज तर तुझा अभिमान आहे!

पुतणे: राजन, दीपक, संतोष, महेश, सत्यवान, मनोहर, सुनील, सुधीर, सागर.पुतणी: सविता, ममता, गौरी, माया, छाया, शोभा, सुप्रिया, सुजाता, सुवर्णा, वर्षा, राखी. या सर्वांच्या संसारात तू मार्गदर्शक म्हणून नेहमीच पाठीशी राहिली आहेस. अशोक, अविनाश, कृष्णा, योगेश्वर, शरद व संग्राम या जावईबापूंनीही या कुटुंबाला तितकंच प्रेम दिलं.

पुढची पिढी… तुझ्या संस्कारांची फुले: तुझ्या डोळ्यांसमोर बागडणारे नातू डॉ. यश, हेमंत, गौरेश, पुरुषोत्तम, आयुष, अभय, अथर्व, शौर्य, प्रथमेश, स्वरूप, कुशल आणि लाडक्या नाती खुशी, मंजिरी, अनुश्री, धनश्री, स्वरा, गौरांगी, उत्कर्षा, अंकिता, सुहानी, सलोनी, स्वामिनी, श्रेया, वैष्णवी व सृष्टी… ही सगळी तुझ्या प्रेमाची फळं आहेत. अगदी छोटा निशांत (पतवंड) सुद्धा तुझ्याच मायेच्या ओलाव्यात वाढतोय.

आई, तू फक्त एक व्यक्ती नाहीस, तू एक संस्था आहेस! जयराम (बाळा), दीपक (बाबू), संतोष, सत्यवान, मनोहर, राजन, संजय, महेश, सुनील, सुधीर, सागर या सर्व मुलांच्या आणि सुनांच्या (अनुराधा,प्रणिता, दिव्या, शीतल, सई, रोशनी, करुणा, शुभांगी, गीता, सरिता) आयुष्यात तुझे स्थान अढळ आहे.

ही सगळी संपदा तुझी आहे आई! > तू दिलेली शिकवण, तू सोसलेले कष्ट आणि तू जपलेली नाती हीच आमची खरी पुंजी आहे. तुझा आशीर्वाद असाच या संपूर्ण ‘परिवारावर’ सदैव राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! तुझा ऋणी, तुझा संपूर्ण परिवार

– तुझं लेकरू शब्दशिल्पकार : हरिश्चंद्र (विजय) चंद्रावती चंद्रकांत पवार सातार्डा ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here