आज कोकण रेल्वे सावंतवाडी टर्मिनस प्रश्नी बेलापूर येथे बैठक, सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी दि.२७ कोकण रेल्वेच्या ‘सावत्र’ कारभाराविरोधात कोकणात संताप व्यक्त होत आहे. सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम, राजधानी व गरीब रथचे थांबे रद्द करणे आणि अमृत भारत योजनेत कोकणातील स्थानकांना डावलणे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. २७ जानेवारी रोजी बेलापूर येथील बैठकीकडे सर्वांचे लक्ष असून, सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण रेल्वेच्या ‘सावत्र’ कारभाराविरोधात संताप; सावंतवाडी टर्मिनस, राजधानी थांबा आणि अमृत भारत योजनेचा मुद्दा ऐरणीवर

कोकण रेल्वेसाठी जमिनी देणाऱ्या कोकणवासीयांनाच आज आपल्या हक्कासाठी लढावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे महामंडळाच्या कथित ‘सावत्र’ कारभाराविरोधात कोकणात तीव्र असंतोष व्यक्त होत असून, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम, राजधानी व गरीब रथ एक्सप्रेसचे थांबे आणि अमृत भारत योजनेतील दुर्लक्ष या मुद्द्यांवरून नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाले असतानाही, आज टर्मिनसच्या अस्तित्वावरच पुरावा मागितला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात सावंतवाडी स्थानकातून राजधानी व गरीब रथचे थांबे अचानक रद्द करण्यात आले, मात्र माहिती अधिकारात विचारणा केली असता “रेकॉर्ड उपलब्ध नाही” असे उत्तर देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.२७ जानेवारी रोजी बेलापूर येथील बैठकीकडे सर्वांचे लक्ष असून, सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here