कोकणच्या सांस्कृतिक एकसंधतेचे प्रतीक: ‘बारापाच’ गावरहाटी आणि जत्रोत्सव

सिंधुदुर्ग दि.२७: कोकणच्या लाल मातीतील लोकसंस्कृती आणि देवभक्तीचा अनोखा संगम म्हणजे येथील ‘गावरहाटी’. गोव्यापासून रत्नागिरीपर्यंत पसरलेल्या या बारापाच देवस्थानच्या जत्रोत्सवांना कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमेपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि शिस्तीचा एक पुरातन नमुना म्हणून या जत्रोत्सवांकडे पाहिले जाते. याबाबतची माहिती मळगाव येथील देवस्थानची जाणकार शामसुंदर राऊळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे.गावरहाटीची त्रिसूत्री आणि सामाजिक संरचना
कोकणातील ग्रामरचनेत ‘बारापाच’ देवस्थानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधिभौतिक, आधिदैविक आणि आधिआध्यात्मिक ताळमेळ राखण्यासाठी ही व्यवस्था पूर्वापार चालत आली आहे. यामध्ये राजसत्ता, पूर्वसत्ता, कुळकर, स्थळकर आणि भूमीचा मूळ मालक महार अशा पाच महत्त्वाच्या घटकांचा समन्वय असतो. श्री देव रवळनाथ हे या बारापाच देवस्थानचे ‘राजसत्ताप्रमुख’ मानले जातात.

शिस्त आणि सीमांचे अनोखे समीकरण
कोकणातील जत्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे गावागावांतील परस्पर समन्वय. एका गावात रवळनाथाची जत्रा असताना, त्याच्या सीमेला लागून असलेल्या दुसऱ्या गावात त्याच वेळी जत्रा नसते. इतकेच नव्हे, तर शेजारच्या गावात उत्सव सुरू असताना सीमेवरील गावकरी आपल्या देवाचा ‘प्रसाद’ किंवा ‘कौल’ लावत नाहीत. “आज देवाचे सुकृत तत्व शेजारच्या गावी गेले आहे,” अशी यामागची उदात्त भावना असते.

वेंगुर्ले येथे सोमवती अमावास्येला होणारे समुद्रस्नान असो किंवा मळगाव-सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीची प्रसिद्ध ‘लोटांगण’ जत्रा, या सर्व ठिकाणी शिस्तीचे पालन काटेकोरपणे केले जाते. जोपर्यंत स्थानिक मुख्य देवतांचे स्नान होत नाही, तोपर्यंत इतर गावांतील तरंग किंवा पालख्या समुद्रात प्रवेश करत नाहीत.

दशावतार: जत्रांचे मुख्य आकर्षण
कोकणी जत्रेचा प्राण म्हणजे ‘दशावतार’ नाट्य. श्रीगणेश पूजन आणि शंकासुर वधाच्या कथानकाने सुरू होणारे हे नाटक उत्तरार्धात रामायण-महाभारतातील आख्यानांनी रंगते. पालखी प्रदक्षिणा, झांज-मृदंगाचा ताल आणि शार्दूलविक्रीडित श्लोकांच्या गजरात होणारा हा उत्सव भक्तांना मंत्रमुग्ध करतो.

शेकडो वर्षांची अखंड परंपरा
आदिलशाही, निजामशाही आणि इंग्रज राजवटीतही ही गावरहाटी आणि त्यातील नीतिमत्ता तसूभरही ढळली नाही. “कोकणपुराधिनाथ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव रवळनाथाप्रती असलेली ही श्रद्धा आजही कोकणी माणसाला एकत्र बांधून ठेवते. वर्षातून एकदा होणाऱ्या या जत्रेत नारळ आणि पाच केळी अर्पण करून कृतकृत्य होणारा कोकणी माणूस, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली ही संस्कृती आजही तितक्याच निष्ठेने जपत आहे.

वृत्त संकलन: शामसुंदर राऊळ मोबा.8381085205

शामसुंदर राऊळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here