. सावंतवाडी दि.२७ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी अनेक आमिषे दाखवून किंवा इतर मार्गांचा वापर करून निवडणूक अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव आणला जात असून या आमिषाला बळी पडून काही ठिकाणी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. जो पॅटर्न महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान कल्याण डोंबिवली , ठाणे येथे राबविण्यात आला तोच पॅटर्न आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली असून या नव्या पॅटर्न मुळे हळूहळू लोकशाही संपुष्टात येणार असून राजकारणाची वाटचाल हळूहळू हुकूमशाहीच्या दिशेने चालू झाली आहे. सत्तेच्या व पैशाच्या मस्तीत वावरणाऱ्यांनी शह काटशहाच्या राजकारणामुळे लोकशाही संपुष्टात आणण्याचे पाप सुरू केले असून यामुळे भविष्यात सर्वसामान्य लोक मतदानाकडे पाठ फिरवतील व हुकूमशाही अस्तित्वात येण्याची भीती असल्याची टीका ॲड.अनिल केसरकर यांनी केली आहे. पक्षासाठी तन मन व धन अर्पण करून काम करणारे कार्यकर्ते सत्तेच्या राजकारणात बाजूला फेकले जात असून फक्त पैसा फेकून आपण निवडून येवू शकतो हा नवा राजकीय ट्रेंड आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे असा आरोप ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे.