27.8 C
New York
Saturday, July 4, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 80

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नवीन वाणांना नाविन्यतेसाठी राष्ट्रीय स्तरावर मानांकन

 

अच्युत तेंडोलकर


रघुनाथ नाईक

वेंगुर्ले दि.०२: डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वनस्पती जाती व शेतकरी अधिकार प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील विविध शेतकऱ्यांकडे असलेल्या जायफळ आणि कोकम या पिकातील तसेच इतर पिकातील नाविन्यपूर्ण जातीची नोंदणी करण्यासाठी “डस चाचणी केंद्र” उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे कुडाळ येथे कार्यान्वित आहे. याबाबतची माहीती मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नवीन वाणांना नाविन्यतेसाठी राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाले आहे. यामध्ये तेंडोली, कुडाळ येथील अच्युत तेंडोलकर यांच्या बागेतील जायफळाच्या दोन विशिष्ट वाणांना “तेंडोली समर्थ १ आणि तेंडोली समर्थ २’ असे राष्ट्रीय स्तरावर नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. आरोस, दांडेली येथील प्रगतशील शेतकरी रघुनाथ नाईक यांच्या बागेतील नाविन्यपूर्ण जायफळाच्या वाणाला “गीतारोझ” या नावाने मानांकन मिळाले असून त्याचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मालवण कुंभारमाठ येथील शेतकरी डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या लालसर असणाऱ्या शेवग्याला “सिंधुदुर्ग कुंभारमाठ उत्तम” अशा नावाने नोंदणी झाली आहे. या केंद्रामार्फत रायगड जिल्ह्यातील दिवेआगर भागातील तीन शेतकऱ्यांना कोकम या पिकातील त्यांच्याकडे असलेल्या तीन वाणांना “अमेय कोकम, शांभवी कोकम आणि वैष्णवी कोकम” या नावांनी राष्ट्रीय स्तरावर नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. रत्नागिरी जिल्यातील इतर दोन आणि रायगड जिल्ह्यातील इतर तीन जायफळाच्या झाडाना नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सर्व वाण शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरणार असून जायफळ आणि कोकम या पिकाखालील क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे कारण हे वाण वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे त्यांची कलमे मोठ्या प्रमाणात करून त्यांची लागवड होणे आवश्यक आहे. या सर्व शेतकऱ्यांना नोंदणी व इतर सहकार्य, मार्गदर्शन उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. महेश शेडगे, सह प्रकल्प प्रमुख डॉ. जया वाघ, वरिष्ठ संशोधन छात्र हर्षद नाईक आणि यंग प्रोफेशनल कु. सुषमा पालव यांनी केली आहे.
या प्रकल्पाचे काम उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे सुरू असून या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन, प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्याकडे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्य वाण तपासले जातात. त्यांची निरीक्षणे घेऊन तसा अहवाल वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली येथे पाठवला जातो. त्यानंतर त्यांचा सखोल अभ्यास करूनच मग नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. संबंधित शेतकरी किंवा शेतकरी समूह त्यासाठी अर्ज करू शकतात. या अर्जात त्यांच्याकडील वाणांची सखोल माहिती दिलेली असते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या वाणांची नोंदणी वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे झाल्यावर अभ्यासाअंती नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते.
शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित – डॉ. विजय दळवी!
मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी माहीती देताना म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या जुन्या व नाविन्यपूर्ण वाणांची माहिती देऊन त्याची नोंदणी केल्यास त्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पन्न वाढेल. तसेच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा देखील होऊ शकतो व तो आपल्या शेतकऱ्यांनी करून घेणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहिती व प्रक्रिया उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील डस चाचणी केंद्रामार्फत मोफत दिली जाते आणि प्रक्रिया पूर्ण करण्यास सहकार्य केले जाते.

दोडामार्गमध्ये महायुतीचा झंझावात!

उद्यापासून  विशाल परब मैदानात; विजयाचा निर्धार

सावंतवाडी दि २: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत दोडामार्ग तालुक्यात आता राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब उद्यापासून (३ फेब्रुवारी) तालुक्यात प्रचाराचे वादळ घेऊन मैदानात उतरणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांनी कंबर कसली असून, या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

महायुतीची आधीच मोठी आघाडी
या निवडणुकीत महायुतीने सुरुवातीलाच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली महायुतीची वाटचाल सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील २५ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्यामुळे महायुतीचे पारडे जड झाले आहे.

दोडामार्गच्या ‘नऊ’ जागांवर लक्ष
आता सर्वांचे लक्ष दोडामार्ग तालुक्यातील उर्वरित जागांकडे लागले आहे. यामध्ये जिल्हा परिषद: ३ जागा
पंचायत समिती: ६ जागा यांचा समावेश आहे.

या नऊही जागांवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी विशाल परब स्वतः मैदानात उतरून प्रचार करणार आहेत. विशाल परब यांचा ग्रामीण भागातील दांडगा जनसंपर्क आणि तरुणांमधील असलेली लोकप्रियता महायुतीसाठी जमेची बाजू ठरणार आहे.

“दोडामार्ग तालुक्यातील सर्व नऊ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा प्रतिसाद पाहता महायुतीचा विजय निश्चित आहे.”

— विशाल परब (युवा नेते, भाजप)

या दौऱ्यामुळे दोडामार्गच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

तारकर्ली एमटीडीसी कार्यालयाला भीषण आग; लाकडी वास्तू भस्मसात

आगीत खाक झालेले साहित्य

लाखो रुपयांचे नुकसान

मालवण दि. ०२: कोकणातील पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) कार्यालयाला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत कार्यालयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली लाकडी बोटीच्या प्रतिकृतीची वास्तू पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कार्यालयातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येताना स्थानिकांना दिसल्या. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कार्यालयाची इमारत लाकडी असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांत रौद्र रूप धारण केले.

दप्तर व साहित्य: कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज, संगणक संच, फर्निचर आणि इतर यंत्रणा जळून खाक झाली.इमारत: हे कार्यालय एका आकर्षक लाकडी बोटीच्या प्रतिकृतीमध्ये होते. लाकूड असल्यामुळे आग वेगाने पसरली आणि इमारत जमिनीदोस्त झाली.जीवितहानी टळली: सुदैवाने ही घटना पहाटे घडली, जेव्हा कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत सर्व साहित्य भस्मसात झाले होते.तमिळनाडूतील महाबलीपुरम असो किंवा कोकणातील तारकर्ली, पर्यटन केंद्रांचे नुकसान होणे ही मनाला चटका लावणारी घटना आहे.

“तारकर्ली हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे केंद्र आहे. या आगीमुळे प्रशासकीय कामावर आणि पर्यटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे.” — स्थानिक प्रशासन

भरधाव वेगात जाणाऱ्या कारची जोराची धडक बसून पादचारी महिला जागीच ठार

अपघातग्रस्त कार

मुंबई -गोवा महामार्गावरील घटना

कुडाळ दि.०२:
मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी- मोरजकरवाडी येथे सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारची जोराची धडक बसून पादचारी श्रीमती आशा सोनू धुरी ( 65, रा. पिंगुळी- धुरीटेंबनगर ) या जागीच ठार झाली.ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली.त्या घाट जात असताना ही घटना घडली.श्रीमती धुरी या आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे चालत घरकामाला जात होत्या. महामार्गावर पिंगुळी- मोरजकरवाडी येथे मुबईहुन दोडामार्ग – सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती सुझूकी एक्स. एल 6 कारची पादचारी श्रीमती धुरी यांना जोराची धडक बसली.यात त्या जागीच ठार झाल्या. धडकेनंतर सदर कार साधारण 35 ते 40 मीटर अंतरावर जाऊन थांबली.घटना पिंगुळी- धुरीटेंबनगर व मोरजकरवाडी येथील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. कुडाळ पोलीस व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.या घटनेने पिंगुळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महायुतीमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक योजना रखडल्या

कुडाळ येथे ठाकरे शिवसेनेचा ‘वचननामा’ प्रसिद्ध करताना माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख वैभव नाईक सोबत तालुका प्रमुख राजन नाईक, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, बबन बोभाटे आदी पदाधिकारी

माजी आमदार वैभव नाईक यांचा घणाघात

कुडाळ दि.०२: जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी गेल्या २५ वर्षांत शाश्वत विकासाऐवजी भ्रष्टाचारातून स्वतःची माया जमवली असून, महायुती सरकारच्या काळात जिल्हा परिषदेच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना रखडल्या आहेत, अशी बोचरी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली. कुडाळ-मालवण मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेचा ‘वचननामा’ प्रसिद्ध केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वचननाम्यातील प्रमुख मुद्दे आणि सत्ताधाऱ्यांवर आरोप
ठाकरे शिवसेनेने या निवडणुकीत ४४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या निमित्ताने वैभव नाईक यांनी विद्यमान आमदार आणि पालकमंत्र्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यांनी मांडलेले मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे:
आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे: जिल्ह्यातील ३८ आरोग्य केंद्रांपैकी केवळ ४ केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध आहेत.
शिक्षणाकडे दुर्लक्ष: जिल्हा परिषदेच्या शाळा सातत्याने बंद पडत असून शैक्षणिक दर्जा खालावला आहे.
भ्रष्टाचाराचा कळस: जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असून विकासकामांमध्ये टक्केवारीचे प्रमाण वाढले आहे. निविदेसाठी (Tenders) जिल्हा परिषदेत बाउन्सर बोलावले गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
योजनांची टाळेबंदी: जिल्ह्यासाठी महत्त्वाची असलेली ‘सिंधुरत्न योजना’ बंद करण्यात आली, तर मनरेगाची मजुरी अद्याप थकलेली आहे.
धनशक्तीचा वापर: मागील निवडणुकांमध्ये पैसे वाटप करून मते मिळवली गेली, आता तर विरोधी उमेदवारांना २५ ते ४० लाखांचे आमिष दाखवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
“जिल्हा परिषद हा विकासाचा कणा आहे, मात्र १९९७ पासून सत्तेत असलेल्या त्याच चेहऱ्यांनी जिल्ह्याचा विकास करण्याऐवजी स्वतःचे बंगले आणि बँक बॅलन्स वाढवले आहेत. पुन्हा तेच लोक निवडून आले तर भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली जाईल.” — वैभव नाईक, माजी आमदार

सतीश सावंतांच्या भाजप प्रवेशावर टोला
सतीश सावंत यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना नाईक म्हणाले की, “जर ते विकासासाठी भाजपमध्ये गेले असतील, तर त्यांची विकासाची नेमकी व्याख्या काय आहे हे त्यांना विचारावे लागेल. कोणता विकास पाहून त्यांनी हा निर्णय घेतला, हे मी त्यांना नक्कीच विचारेन.”
कुडाळ-मालवणमध्ये स्वाभिमानी लढत
कणकवली मतदारसंघात ९५% जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी, कुडाळ-मालवणमधील ठाकरे सेनेचे उमेदवार धनशक्तीला किंवा दबावाला बळी पडले नाहीत. आमचे उमेदवार ठाम असून आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, बबन बोभाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले

 सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

सावंतवाडी दि.०२: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुःखद निधनामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
‘घड्याळाच्या काट्याला वेग देणारे नेतृत्व’
श्रद्धांजली अर्पण करताना संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, अजितदादा हे केवळ एक नेते नव्हते तर सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ होते. महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला प्रगत आणि आधुनिक बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. “घड्याळाच्या काट्याप्रमाणे काम न करता, आपल्या कार्यकर्तृत्वाने घड्याळाच्या काट्याला देखील वेग देणारे नेतृत्व” अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा आणि योगदानाचा वारसा सहकार क्षेत्राला सदैव प्रेरणा देत राहील.

भोगटे प्लाझा, गवळी तिठा येथील प्रधान कार्यालयात आयोजित या शोकसभेला संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
चेअरमन: श्री. बाबूराव कविटकर
व्हा. चेअरमन: श्री. चंद्रकांत शिरसाट
संचालक: श्री. दिनानाथ सावंत, श्री. सुभाष सावंत, श्री. भिवा गावडे, श्री. श्यामसुंदर सावंत, श्री. चंद्रशेखर जोशी, श्री. संतोष मुसळे, श्री. बाबू वरक, श्री. शांताराम पवार.
मुख्य कार्यकारी अधिकारी: श्री. सुनील राऊळ
याप्रसंगी संस्थेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अजितदादांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

“तो लढतोय केवळ विकासासाठी…!”

कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात महेश सारंग यांचा विकासाचा ठाम अजेंडा

सावंतवाडी दि.०२:
सावंतवाडी शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेले कोलगाव गाव शहरालगत असल्याने विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, ही येथील प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. मात्र हा विकासाचा भार कोण समर्थपणे पेलू शकतो, असा प्रश्न निर्माण होताच महेश सारंग हे नाव आपसूकच पुढे येते.
महेश सारंग यांची राजकीय कारकीर्द सरपंच पदापासून सुरू झाली. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धाडसी आणि लोकाभिमुख निर्णय घेत आपल्या नेतृत्वाची ठळक छाप उमटवली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीत मातोश्री वृंदा सारंग यांनी सावलीसारखे सोबत राहून त्यांना बळ दिले.
जीवनात आलेल्या अनेक कटू प्रसंगांवर मात करत महेश सारंग यांनी संयम आणि चिकाटीने पुढे वाटचाल केली. त्यांच्यावर झालेले आरोप व टीकांना त्यांनी शब्दांनी नव्हे, तर ठोस विकासकामांच्या माध्यमातून उत्तर दिले. ही कामे इतकी प्रभावी ठरली की विरोधक वेळोवेळी चितपट होत गेले.
आज कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव व कारिवडे या गावांचा समावेश असलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघातून महेश सारंग हे भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व इतर घटक पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आरोपांची मालिका सुरू असली तरी महेश सारंग मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे विकासकामांवर भर देताना दिसत आहेत.
“माझा एकमेव मुद्दा हा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आहे,” असे ते ठामपणे सांगतात. रस्ते, पाणी, वीज, सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. मतदारसंघातील वाडी-वाडीपर्यंत पोहोचलेले रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज व्यवस्था ही त्यांच्या कामांची पोचपावती ठरत आहेत.
घरकुल योजनांच्या बाबतीत जिल्ह्यात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी मंजूर करून आणलेली घरकुले ही विरोधकांच्या गणिताच्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे बोलले जाते. तसेच युवकांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक युवकांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
“युवा हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा आणि देशाचा विकास करावा,” ही त्यांची प्रामाणिक भूमिका आहे. रात्री-अपरात्री नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा, ऊन-पावसाची तमा न बाळगता काम करणारा, केवळ बोलणारा नव्हे तर करून दाखवणारा नेता म्हणून महेश सारंग यांची ओळख निर्माण झाली आहे.
विरोधकांकडे विकासाचा ठोस मुद्दा नसल्याने केवळ विरोधाला विरोध सुरू असल्याची चर्चा असली, तरी महेश सारंग हे विकासाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांचा विजय निश्चित असल्याचा सूर सर्वत्र ऐकू येत आहे.
म्हणूनच आज सर्वत्र एकच चर्चा —
“तो लढतोय केवळ विकासासाठी…!”

घोषणांचा पाऊस… विकासाचा दुष्काळ! रेल्वे टर्मिनसचे काम नक्की कधी?

घोषणांचा पाऊस… विकासाचा दुष्काळ! रेल्वे टर्मिनसचे काम नक्की कधी?
२०१५ ची घोषणा, २०१९ चे भूमिपूजन… २०२६ उजाडले तरी ‘जैसे थे”!

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वेला २.८१ लाख कोटी मिळाले, पण आपल्या सावंतवाडीच्या वाट्याला काय? ❌ २०१५ पासून फक्त घोषणा! ❌ २०१९ ला झालेले भूमिपूजन हवेतच! ❌ पाणीपुरवठा आणि प्लॅटफॉर्मचे काम आजही अधांतरी!
आता वेळ आली आहे जाब विचारण्याची… आम्हाला आश्वासने नको, ‘परिपूर्ण कोचिंग टर्मिनस’ हवे! ✊
——————–++++++++++

‘मत हवे तर टर्मिनस द्या!’; सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या दुरावस्थेवरून जनतेचा संताप
घोषणांचा पाऊस, पण विकासाचा दुष्काळ; जागरूक सावंतवाडीकरांचा लोकप्रतिनिधींना थेट इशारा

सावंतवाडी दि.०२: गेल्या अनेक वर्षांपासून केवळ घोषणांच्या भोवऱ्यात अडकलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न आता चांगलाच तापू लागला आहे. “आता आश्वासने नकोत, प्रत्यक्ष काम दाखवा, अन्यथा मत मागायला येऊ नका,” अशा आक्रमक पवित्र्यात सावंतवाडीकर दिसत असून सोशल मीडियासह सर्वच स्तरांतून लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
घोषणांची ‘एक्स्प्रेस’ धावतेय, पण काम ‘शंटिंग’लाच!
सावंतवाडीच्या रेल्वे विकासाचे स्वप्न कागदावरच असल्याचे सांगत स्थानिकांनी पुराव्यांसह प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत

हॉटेल प्रकल्पाचा फार्स: जून २०१५ मध्ये घोषणा झालेल्या आणि मे २०१९ मध्ये सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ‘रेलोटेल हॉटेल’चे काम अद्याप सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०२५ मध्ये पुन्हा एकदा याच हॉटेलच्या बांधकामाची घोषणा झाली, ज्यामुळे “नक्की काम कधी होणार?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तिलारीच्या पाण्याचा प्रश्न: टर्मिनससाठी अत्यावश्यक असलेल्या पाणीपुरवठ्याची निविदा प्रक्रिया नेकी कुठे अडकली आहे? याचे उत्तर आजही जनतेला मिळालेले नाही.
अपुऱ्या सुविधा: नवीन प्लॅटफॉर्म, रेल्वे रूळ आणि इतर तांत्रिक सुविधांच्या घोषणा केवळ पोकळ ठरल्याचा आरोप होत आहे.

‘जागरूक सावंतवाडीकर’ आक्रमक
“मत हवे तर टर्मिनस द्या,” हा नवा नारा आता सावंतवाडीत घुमू लागला आहे. विकासाच्या नावाखाली केवळ निवडणुकांपुरती आश्वासने देणाऱ्या नेत्यांना आता जनता जाब विचारत आहे. परिपूर्ण रेल्वे कोचिंग टर्मिनससाठी तातडीने निधी उपलब्ध करून कोकणच्या रेल्वे विकासाला गती द्यावी, अशी कळकळीची विनंती ‘जागरूक सावंतवाडीकर’ समूहाने केली आहे.

“विकासाचे स्वप्न आम्ही गेली अनेक वर्षे पाहत आहोत, पण १५ फेब्रुवारी २०२५ च्या संदर्भाप्रमाणे आजही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आता आम्हाला केवळ कागदी प्रकल्प नकोत, तर जमिनीवर काम हवे आहे.” — सावंतवाडीचे स्थानिक नागरिक

सोनं-चांदीच्या दरांचा ‘फुगा’ फुटला; एकाच दिवसात किमती कोसळल्या!

मुंबई दि.०२: सोन्या-चांदीच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आता गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. गुरुवारी चांदीने ४ लाख २० हजार रुपयांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला होता, मात्र शुक्रवारी आणि त्यानंतरच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत तब्बल १.०७ लाख रुपयांची मोठी पडझड झाली आहे.

प्रमुख ठळक मुद्दे:
चांदीची ऐतिहासिक घसरण: चांदीचा दर जो ४ लाख २० हजार रुपयांच्या पार गेला होता, तो आता थेट २ लाख ९१ हजार ९२२ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

सोन्याचे दरही गडगडले: सोन्याच्या दरातही १० ग्रॅममागे सुमारे ३३,११३ रुपयांची मोठी घट झाली असून, भाव १.५० लाख रुपयांच्या आसपास स्थिरावले आहेत.

प्रॉफिट बुकिंगचा फटका: किमती उच्चांकावर पोहोचल्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा वसुली (Profit Booking) सुरू केल्याने ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घसरणीची मुख्य कारणे काय?
तज्ज्ञांच्या मते, ही घसरण केवळ योगायोग नसून त्यामागे जागतिक स्तरावरील महत्त्वाची आर्थिक कारणे आहेत.डॉलरची मजबुती: आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या मागणीवर परिणाम झाला आहे.

US Fed मधील बदल: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी ‘केविन वॉर्श’ यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर झाला.

ट्रम्प फॅक्टर: डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही विधानांमुळे जागतिक राजकीय तणाव काहीसा कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे, ज्यामुळे ‘सेफ हेवन’ (सुरक्षित गुंतवणूक) म्हणून सोन्याची मागणी घटली.

बजेट २०२६: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत असलेली अस्थिरता आणि नवीन धोरणांची शक्यता यामुळेही दरांवर दबाव वाढला आहे.

आजचे अंदाजित दर (MCX नुसार):
धातू उच्चांकी दर (गुरूवार) चालू दर (अंदाजित) घसरण (एका दिवसात)
चांदी (प्रती किलो) ₹ ४,२०,०४८ ₹ २,९१,९२२ – ₹ १,२८,१२६
सोने (२४ कॅरेट/१० ग्रॅम) ₹ १,८३,९६२ ₹ १,५०,८४९ – ₹ ३३,११३
टीप: वरील दर हे वायदे बाजारातील (MCX) असून, स्थानिक सराफा बाजारात यात टॅक्स आणि मेकिंग चार्जेसमुळे फरक असू शकतो.

सोनं खरेदीदारांसाठी काय सल्ला? जाणकारांच्या मते, ही घसरण म्हणजे बाजारातील एक मोठी ‘करेक्शन’ (दुरुस्ती) आहे. ज्यांना दागिने खरेदी करायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते, मात्र गुंतवणूकदारांनी बाजार अजून स्थिर होण्याची वाट पाहावी.

सावंतवाडीत रशियन पर्यटक दाम्पत्याचा अपघात

जखमी रशियन दाम्पत्यावर उपचार करताना डॉक्टर सोबत सामाजिक बांधिलकीचे सदस्य आणि पोलीस

 ‘सामाजिक बांधिलकी’ने मदतीचा हात देत जपली माणुसकी

सावंतवाडी दि.०२: येथील रेणुका हॉटेल परिसरात काल सायंकाळी रशियन पर्यटक दाम्पत्याच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून, ‘सामाजिक बांधिलकी’ चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना तातडीने उपचार मिळवून दिले. पर्यटकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी हे रशियन जोडपे आपल्या मोटरसायकलवरून जात असताना रेणुका हॉटेलजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये रशियन पर्यटकांच्या हात, पाय आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या परदेशी पर्यटकांना पाहून परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
वेळेवर मिळाली मदत
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी टीमचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, आणि लक्ष्मण कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना धीर देत तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. केवळ रुग्णालय गाठून न थांबता, उपचार सुरू होईपर्यंत त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.
याकामी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे महेश जाधव आणि मनोज राऊत यांनीही मोलाची भूमिका बजावली. परदेशी पर्यटकांना भाषेची अडचण येऊ नये आणि त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम केले.
सामाजिक भावनेचे दर्शन
कोकणात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांवर ओढवलेल्या या संकटकाळात स्थानिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे माणुसकीचे दर्शन घडले आहे. सध्या जखमी पर्यटकांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.