सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या ३८ व्या वार्षिक व्यापारी एकता मेळाव्याचे उद्घाटन करताना चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे सोबत रामभाऊ भोगले, महेश चव्हाण, ॲड. अजित गोगटे, प्रसाद पारकर, नितीन वाळके, शैलेश कदम आदी
देवगड येथे ३८ व्या जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात ग्राम उद्योग क्रांतीचा संकल्प; रवींद्र माणगावे यांचे प्रतिपादन
देवगड दि.३१: महाराष्ट्रात हरित, धवल आणि शैक्षणिक क्रांतीनंतर आता **’ग्राम उद्योग क्रांती’**ची लाट निर्माण झाली आहे. ‘गाव तिथे उद्योजक’ या संकल्पनेतून आगामी २ ते ४ वर्षांत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ३६ हजार नवे उद्योजक घडविण्याचा मानस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने व्यक्त केला आहे. देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या ३८ व्या वार्षिक व्यापारी एकता मेळाव्यात चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे बोलत होते.
या मेळाव्याचे उद्घाटन रवींद्र माणगावे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष रामभाऊ भोगले, महेश चव्हाण, माजी आमदार ॲड. अजित गोगटे, जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कार्याध्यक्ष नितीन वाळके, देवगड तालुकाध्यक्ष शैलेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
📢 मेळाव्यातील महत्त्वाचे मुद्दे:
डिजिटल बदलांची गरज: ऑनलाईन व्यापाराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म, बल्क खरेदी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज असल्याचे रवींद्र माणगावे यांनी स्पष्ट केले.
मूल्याधिष्ठित व्यापार: “व्यापार मूल्यांवर आधारित असेल तरच तो दीर्घकाळ टिकतो. जुन्या पिढीने नव्या तंत्रज्ञानाची जोड घ्यावी,” असे आवाहन रामभाऊ भोगले यांनी केले.
सिंधुदुर्गात संधी: उद्योजक अविनाश पेडणेकर यांनी जिल्ह्यात लॉजिस्टिक आणि पर्यावरणपूरक पर्यटनासाठी मोठी संधी असल्याचे सांगत व्यापारी महासंघासाठी स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली.
महिलांचा सहभाग: व्यापार क्षेत्रात महिला उद्योजिका सक्षमपणे पुढे येत असून, त्यांना संघटित पाठबळ देण्याची गरज प्रियांका साळसकर यांनी व्यक्त केली.
💰 व्यापारी महासंघाचे महत्त्वपूर्ण निर्णय:
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सरचिटणीस नितीन वाळके यांनी वार्षिक अहवाल सादर करताना काही मोठ्या घोषणा केल्या:
आपत्कालीन निधी: व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी १ कोटी रुपयांचा सहायता निधी उभारणार.
आरोग्य यंत्रणा: जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण समितीची स्थापना.पावसाळी पर्यटन: जिल्ह्याच्या पर्यटनाला वर्षभर चालना देण्यासाठी विशेष योजना.प्रशिक्षण: अन्नसुरक्षा परवाना नूतनीकरण आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन.
🏆 विविध पुरस्कारांचे वितरण:
या सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला:जीवनगौरव पुरस्कार: राजाराम कदम (ज्येष्ठ व्यापारी),आदर्श पर्यटन उद्योजक: श्रीकांत व वैष्णवी जोईल,आदर्श महिला उद्योजिका: सौ. सुषमा सदानंद देसाई,युवा उद्योजक: विजय उर्फ बंटी प्रमोद कदम,आदर्श व्यापारी व शेतकरी: प्रसन्न गोगटे,पर्यटन व सेवा उद्योग: प्रसाद गावडे (रानमाणूस),उत्कृष्ट तालुकाध्यक्ष: उमेश नेरुरकर (मालवण)यांचा सन्मान करण्यात आला.
या मेळाव्याचे औचित्य साधून देवगड पर्यटन समितीच्या वतीने ‘फिश फूड अँड फेस्टिव्हल २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. सूत्रसंचालन मिलिंद कुबल व सौ. विद्या माणगावकर यांनी केले.
मुंबई दि.३१ : राजभवनामध्ये शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.
अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नवा गटनेता कोण होणार? नवे उपमुख्यमंत्री कोण असणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज राजभवानामध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील त्यांची निवड करण्यात आली आहे.
आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीला पक्षाच्या सर्व आमदारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले, पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवडी संदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा संविधानिक अधिकार मिळण्यासंदर्भात होता. या दोन्ही प्रस्तावाला या बैठीकेमध्ये मंजुरी मिळाली, सुनेत्रा पवार यांची या बैठकीमध्ये गटनेता म्हणून निवड करण्यात आली, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रिपदापूर्वी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या.
मिलाग्रीज हायस्कूल मध्ये अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना
सावंतवाडी दि.३१-: उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीच्या वतीने श्रद्धांजलीमिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रे . फादर रिचर्ड सालदाना यांनी अजित दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्राच्या एका महान नेतृत्वाला महाराष्ट्र मुकल्याची भावना प्रशालेचे मुख्याध्यापक रे .फादर रिचर्ड सालदाना यांनी व्यक्त केली.
भूतनाथ मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शानदार शुभारंभ; प्रमोद गावडेंचे आशीर्वाद पाठीशी असल्याचा दावा
सावंतवाडी दि.३१: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ केवळ नावापुरता मर्यादित न ठेवता, तो विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात ‘आदर्श’ आणि ‘क्रमांक एक’वर नेण्याचा संकल्प महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी व्यक्त केला आहे. आज तळवडे येथील ग्रामदैवत श्री देव भूतनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकला.
भक्तीमय वातावरणात प्रचाराचा प्रारंभ
प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी मंदिरात पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. देवदर्शन घेऊन रणांगणात उतरलेल्या संदीप गावडे यांनी मतदारांशी संवाद साधत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
विकासकामांच्या जोरावर मतदारांना साद
आपल्या कामाचा पाढा वाचताना संदीप गावडे म्हणाले की, “मी आणि माझे प्रतिस्पर्धी एकाच वेळी राजकारणात आलो, मात्र मी केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित न राहता सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांत सातत्याने काम केले आहे.” त्यांनी प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर दिला:
शिक्षण: विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि शाळांमध्ये भौतिक सुविधांची उपलब्धता.ऊर्जा: सोलर पॅनेलच्या माध्यमातून गावागावांत अखंडित वीजपुरवठा. “माझ्या कामाची तुलना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कामाशी जनतेने स्वतः करावी,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.
नाराजी नाट्यावर पडदा?
तिकीट न मिळाल्याने ज्येष्ठ नेते प्रमोद गावडे नाराज असल्याच्या चर्चांवर संदीप गावडे यांनी स्पष्टीकरण दिले. “मी प्रमोद गावडे यांची भेट घेतली असून त्यांची कोणतीही नाराजी नाही. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि लवकरच ते पूर्ण ताकदीने प्रचारात उतरतील,” असे सांगत त्यांनी अंतर्गत कलहाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.दिग्गजांच्या साथीने विकासाचा ‘रोडमॅप’
मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीच्या नेत्यांचे पूर्ण सहकार्य असल्याचे सांगत गावडे यांनी आगामी काळातील उद्दिष्टे स्पष्ट केली:
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावणे.काजू उत्पादक आणि उद्योजकांच्या समस्या सोडवणे.पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निधी खेचून आणणे.”तळवडे मतदारसंघाचा कायापालट करणे हेच माझे ध्येय आहे,” असे सांगत त्यांनी मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
ध्रुवकुमार शिवसहाय शर्मा (५१, रा. नालासोपारा, मुंबई) असे या आरोपीला जेरबंद करतांना सावंतवाडी पोलीस
सावंतवाडी दि.३१ वसई-विरार परिसरात एका महिलेवर अत्याचार करून पसार झालेल्या संशयित आरोपीला सावंतवाडी पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. ध्रुवकुमार शिवसहाय शर्मा (५१, रा. नालासोपारा, मुंबई) असे या आरोपीचे नाव असून, त्याला पुढील कारवाईसाठी नालासोपारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा (तुळीज) पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप ध्रुवकुमार शर्मा याच्यावर आहे. या गुन्ह्यानंतर अटकेच्या भीतीने आरोपी मुंबईतून पळून गेला होता. तो कोकणात, विशेषतः सावंतवाडी शहरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
नालासोपारा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना संशयित आरोपी सावंतवाडीत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक निलेश परब आणि हवालदार मनोज राऊत यांनी तातडीने शोधमोहीम राबवली. अत्यंत गोपनीयरीत्या तपास करत पोलिसांनी आरोपीचा पत्ता शोधून काढला आणि त्याला बेड्या ठोकल्या.
सावंतवाडी पोलिसांनी पकडलेल्या या संशयिताला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नालासोपारा पोलिसांच्या पथकाकडे सोपवण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांसाठी ‘सेफ झोन’ समजत लपणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत.
सावंतवाडी दि.३१ :
मोबाईलवर महिलेचा अश्लील फोटो तयार करून तो सर्वत्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी सावंतवाडी, माजगाव गरड येथील अंतोन लुईस देसा( 36 ) या तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सावंतवाडीतील एका महिलेचे फोटो एडिट करून अश्लील फोटो बनविल्या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी त्याच्यावर आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आज सकाळी नऊ वाजता अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.
सावंतवाडी दि.३१: शहरातील बाहेरचावाडा येथील नायरा पेट्रोल पंपा नजीक रफिक जाकीर नाईक याच्या घरावरील गच्चीवर खेळल्या जाणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. याप्रकरणी एकूण अकरा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संशयित रफिक हा आपल्या घरी काही लोकांसह अंदर बाहर जुगार खेळवात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खंदरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू सावळ पो हवालदार महेश जाधव, पो. मनोज राऊत, पो. मयूर सावंत, पो. हनुमंत धोत्रे यांनी रात्री उशिरा छापा टाकत कारवाई केली.
या छाप्यामध्ये २७,५०० रोख रक्कम, ३ मोटर सायकल, १३ मोबाईल असा सुमारे ५ लाख रुपयेच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित अरुण गफार मेमन, जय खलील बक्कर, शफीउल्ला इनायतउल्ला खान, माजीन असलम बेग, नफीस शफी शेख, अरबाज नजीर मकानदार, आफताब युसुफ मेमन, मतीन नसरुद्दीन शहा, हंजला रफिक नाईक, तौसीब सलीम शेख सर्व रा. बाहेरचा वाडा आणि अनिल सिताराम मोरे रा. पान बाजार कुडाळ आदींवर मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
कोल्हापूर दि.३१: येथील पॉवरलिफ्टिंग असोसिएशन तर्फे आयोजित शालेय विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सावंतवाडी येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या ‘ कु. हिना जासिम सारंग ‘ हिने ४० किलो वजनी गट स्पर्धेत ५५ किलोचे वजन उचलून द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकावले. तसेच कु. हिना सारंग हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिच्या पालकांनी, प्रशिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी व शाळेचे संचालक श्री. रूजुल पाटणकर तसेच मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील खूप कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अन्यथा वीज महावितरण च्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा नगरसेवक देव्या सूर्याजींचा इशारा
सावंतवाडी दि.३१: बाजारपेठेतील संचयनी पॅलेसच्या मागील बाजूस असलेला वीज महावितरणचा फिडर पिलर उघडा पडला असून महावितरणचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिक, लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. येत्या चार दिवसात महावितरणने लक्ष द्यावे अन्यथा, महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
महावितरणचे बाजारपेठेतील भागाकडे देखील लक्ष नाही. संचयनी पॅलेस ही निवासी इमारत आहे, लहान मुलं खेळतात. यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर महावितरण प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल त्यांनी केला. तर, एकीकडे पालकमंत्री नितेश राणे व माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर मागणी केल्यानंतर अशा कामांसाठी निधी उपलब्ध करून देतात. मात्र,अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. कादरी मशिद येथील स्ट्रीट लाईटचा बॉक्स देखील अनेक महिने उघडा पडला होता. इशारा दिल्यानंतर तो बदलण्यात आला. त्यामुळे शहरात वस्तीच्या ठिकाणी असलेले उघडे असणारे ट्रान्स्फॉर्मर, फिडर पिलर चार दिवसांत न बदलल्यास वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
सावंतवाडी दि.३०: शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, गुरुवारी रात्री बाहेरचावाडा परिसरात एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत १२ ते १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात शहरातील काही ‘बड्या धेंड्यांचा’ समावेश असल्याची चर्चा रंगली आहे.
सावंतवाडीच्या बाहेरचावाडा परिसरात एका बंदिस्त घरात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे, ही कारवाई ‘११२’ (Emergency Response Support System) या आपत्कालीन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत रात्री साडेआठच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.
ठिकाण: बाहेरचावाडा परिसर, सावंतवाडी.वेळ: रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलेले अंदाजे १२ ते १३ जण आहेत.पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून संशयितांची चौकशी सुरू आहे.या कारवाईत सापडलेल्या लोकांमध्ये काही प्रतिष्ठित आणि बड्या व्यक्तींचा समावेश असल्याने संपूर्ण सावंतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात तक्रारदाराने दाखवलेल्या धाडसामुळे हा अड्डा उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.