सावंतवाडी दि.३१ :
मोबाईलवर महिलेचा अश्लील फोटो तयार करून तो सर्वत्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी सावंतवाडी, माजगाव गरड येथील अंतोन लुईस देसा( 36 ) या तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सावंतवाडीतील एका महिलेचे फोटो एडिट करून अश्लील फोटो बनविल्या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी त्याच्यावर आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आज सकाळी नऊ वाजता अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.
सावंतवाडी दि.३१: शहरातील बाहेरचावाडा येथील नायरा पेट्रोल पंपा नजीक रफिक जाकीर नाईक याच्या घरावरील गच्चीवर खेळल्या जाणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. याप्रकरणी एकूण अकरा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संशयित रफिक हा आपल्या घरी काही लोकांसह अंदर बाहर जुगार खेळवात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खंदरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू सावळ पो हवालदार महेश जाधव, पो. मनोज राऊत, पो. मयूर सावंत, पो. हनुमंत धोत्रे यांनी रात्री उशिरा छापा टाकत कारवाई केली.
या छाप्यामध्ये २७,५०० रोख रक्कम, ३ मोटर सायकल, १३ मोबाईल असा सुमारे ५ लाख रुपयेच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित अरुण गफार मेमन, जय खलील बक्कर, शफीउल्ला इनायतउल्ला खान, माजीन असलम बेग, नफीस शफी शेख, अरबाज नजीर मकानदार, आफताब युसुफ मेमन, मतीन नसरुद्दीन शहा, हंजला रफिक नाईक, तौसीब सलीम शेख सर्व रा. बाहेरचा वाडा आणि अनिल सिताराम मोरे रा. पान बाजार कुडाळ आदींवर मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
कोल्हापूर दि.३१: येथील पॉवरलिफ्टिंग असोसिएशन तर्फे आयोजित शालेय विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सावंतवाडी येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या ‘ कु. हिना जासिम सारंग ‘ हिने ४० किलो वजनी गट स्पर्धेत ५५ किलोचे वजन उचलून द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकावले. तसेच कु. हिना सारंग हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिच्या पालकांनी, प्रशिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी व शाळेचे संचालक श्री. रूजुल पाटणकर तसेच मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील खूप कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अन्यथा वीज महावितरण च्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा नगरसेवक देव्या सूर्याजींचा इशारा
सावंतवाडी दि.३१: बाजारपेठेतील संचयनी पॅलेसच्या मागील बाजूस असलेला वीज महावितरणचा फिडर पिलर उघडा पडला असून महावितरणचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिक, लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. येत्या चार दिवसात महावितरणने लक्ष द्यावे अन्यथा, महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
महावितरणचे बाजारपेठेतील भागाकडे देखील लक्ष नाही. संचयनी पॅलेस ही निवासी इमारत आहे, लहान मुलं खेळतात. यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर महावितरण प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल त्यांनी केला. तर, एकीकडे पालकमंत्री नितेश राणे व माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर मागणी केल्यानंतर अशा कामांसाठी निधी उपलब्ध करून देतात. मात्र,अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. कादरी मशिद येथील स्ट्रीट लाईटचा बॉक्स देखील अनेक महिने उघडा पडला होता. इशारा दिल्यानंतर तो बदलण्यात आला. त्यामुळे शहरात वस्तीच्या ठिकाणी असलेले उघडे असणारे ट्रान्स्फॉर्मर, फिडर पिलर चार दिवसांत न बदलल्यास वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
सावंतवाडी दि.३०: शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, गुरुवारी रात्री बाहेरचावाडा परिसरात एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत १२ ते १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात शहरातील काही ‘बड्या धेंड्यांचा’ समावेश असल्याची चर्चा रंगली आहे.
सावंतवाडीच्या बाहेरचावाडा परिसरात एका बंदिस्त घरात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे, ही कारवाई ‘११२’ (Emergency Response Support System) या आपत्कालीन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत रात्री साडेआठच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.
ठिकाण: बाहेरचावाडा परिसर, सावंतवाडी.वेळ: रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलेले अंदाजे १२ ते १३ जण आहेत.पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून संशयितांची चौकशी सुरू आहे.या कारवाईत सापडलेल्या लोकांमध्ये काही प्रतिष्ठित आणि बड्या व्यक्तींचा समावेश असल्याने संपूर्ण सावंतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात तक्रारदाराने दाखवलेल्या धाडसामुळे हा अड्डा उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हेच ते धोकादायक लोखंडी होर्डिंग्जनगरसेवक अजय गोंदावळे यांचा न प व सा.बां विभागाला आंदोलनाचा इशारा
सावंतवाडी दि.३०: सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर असलेले लोखंडी होर्डिंग्ज अत्यंत जीर्ण झाले असून ते कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. हे धोकादायक होर्डिंग्ज पालिका प्रशासनाने तात्काळ हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांनी दिला आहे.
सावंतवाडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसमोर गेल्या अनेक दिवसांपासून एक अजस्त्र लोखंडी होर्डिंग उभे आहे. सध्या या होर्डिंगची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्याला गंज चढला आहे. हे स्ट्रक्चर कमकुवत झाल्याने ते कोणत्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.
मुंबईत घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती सावंतवाडीत होऊ नये, अशी भीती अजय गोंदावळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की होर्डिंग अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे.रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या आणि वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.
या संदर्भात नगरसेवक गोंदावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन या दोघांनाही धारेवर धरले आहे. “जर हे धोकादायक होर्डिंग तात्काळ काढले गेले नाही, तर नागरिकांच्या जीवासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,” असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.आता या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन आणि बांधकाम विभाग खडबडून जागे होणार का आणि हे ‘मृत्यूचे सापळे’ हटवणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
सावंतवाडी दि.३०: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच सावंतवाडी शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वटसावित्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरात विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जड अंतःकरणाने आणि साश्रू नयनांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
श्रद्धांजली सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या प्रशासकीय पकड आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले.अन्नपूर्णा कोरगावकर (माजी उपनगराध्यक्ष): “अजितदादांच्या जाण्याने पक्षाची आणि राज्याची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. एक खंबीर नेतृत्व आपण गमावले आहे.”
उमाकांत वारंग (विधानसभा अध्यक्ष): त्यांनी दादांच्या कामातील शिस्त आणि वेळेचे महत्त्व यावर भाष्य करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शफिक खान (राज्य सचिव, अल्पसंख्यांक विभाग) व रिद्धी परब (तालुका महिला अध्यक्ष): यांनी दादांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचा उल्लेख करत, त्यांनी सर्व घटकांना दिलेला न्याय याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच व्ही. जे. एन. टी. सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनीही दादांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
अजितदादांच्या निधनामुळे केवळ राजकीय कार्यकर्त्यांमध्येच नव्हे, तर सर्वसामान्यांमध्येही मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या शोकसभेला भार्गवदास शिरोडकर, श्याम बेकनाळकर, शिवहरी खराडे, निलेश माणगावकर, सतीश चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि सावंतवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून निघणारी नाही,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपले दुःख व्यक्त केले. संपूर्ण सावंतवाडी परिसरात आज या दुःखद घटनेमुळे शांतता पसरली होती.
सावंतवाडी येथे वटसावित्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत अन्नपूर्णा कोरगावकर, उमाकांत वारंग, शफिक खान, रिद्धी परब व अन्य पदाधिकारी श्रद्धांजली अर्पण करताना
सावंतवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना तालुकाध्यक्ष उदय भोसले सोबत सुरेश गवस व अन्य
सावंतवाडीत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सावंतवाडी दि.३०: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर, सावंतवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयात शोकसभेचे आयोजन करून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अजितदादा: कामाचा ‘खाक्या’ असलेला नेता
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. “सामान्य कार्यकर्त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि एकदा काम करायचे ठरवले की ते तडीस नेणे, हा दादांचा विशेष खाक्या होता. प्रशासनावर असलेली पकड आणि शब्दाचा पक्का नेता म्हणून त्यांची ओळख होती,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या जाण्याने केवळ पक्षाचेच नव्हे, तर राज्याचे आणि देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
शोकसभेला उपस्थित मान्यवर
या शोकसभेला सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने:तालुकाध्यक्ष: उदय भोसले,प्रदेश चिटणीस: श्री. सुरेश गवस,इतर मान्यवर: एम.डी. सावंत, अनंतराज पाटकर (युवक कार्यकर्ते), विजय कदम (जिल्हाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग), प्रभाकर गावकर (जिल्हाध्यक्ष, कामगार सेल), ऑगस्टीन फर्नांडिस (शहराध्यक्ष), ॲड. सत्यवान चंदवनकर, दीपक देसाई, गुरुदत्त कामत.यासोबतच नंदकिशोर नाईक, मेघेंद्र देसाई (दोडामार्ग तालुकाध्यक्ष), नितेश पाटील, शहाजीराव भोसले, राम लाखे, डॉ. तुषार भोसले, सौ. रंजना निर्मल, रामचंद्र निर्मल, शशिकांत तळवणेकर आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केले.नियतीच्या या अघोरी निर्णयामुळे सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून, “एक झुंजार नेतृत्व हरपले” अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग दि.३०: भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या एशियन रायफल – पिस्टल शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय शुटींग प्रशिक्षक ॲड.विक्रम भांगले यांची या एशियन स्पर्धा आयोजन समितीवर निवड झाली आहे. दिल्ली येथील कर्नेलसिंग आंतरराष्ट्रीय शुटींग रेंजवर दिनांक 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या काळात ही स्पर्धा पार पडणार आहे. भारताला एशियन शुटींग चॅम्पियनशिप सारख्या महत्वपूर्ण स्पर्धेचे आयोज़न करण्यासाठी ही प्रथमच संधी प्राप्त झाली आहे. येऊ घातलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा आणि भविष्यात आयोजनाची संधी मिळण्याची शक्यता असलेल्या ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन हे अतिशय महत्वपूर्ण समजले जात आहे. या स्पर्धेमध्ये आशिया खंडातील विविध देशातील सुमारे 575 खेळाडू सुवर्ण पदकासाठी आपलं कौशल्य पणाला लावणार आहे. सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले ॲड. विक्रम भांगले यांनी नॅशनल रायफल असोसिएशनच्या कोशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्यावर प्रथमच ही आयोज़न समितीची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात वकीली करणारे ॲड. भांगले यांनी यापूर्वी भारतीय संघाचा नेमबाजी प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. तसेच वर्ल्डकप, जागतिक शुटींग स्पर्धा, आशियाई व क्रीडा स्पर्धा ,कॉमनवेल्थ स्पर्धा अशा अनेक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये त्यांनी पंच आणि ऑफिशिअल्स म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रतिनिधी | विशेष लेख
एका अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. आकड्यांच्या भाषेत ही बातमी इथेच संपते. पण वास्तवात मात्र जग थांबलं ते फक्त एका नावासाठी. उरलेले चार जण बातमीच्या शेवटच्या ओळीत हरवून गेले. त्यांच्या नावांचा उल्लेख झाला नाही, त्यांचे फोटो फिरले नाहीत, ना “RIP”चे दोन शब्द लिहिले गेले.
मात्र त्या चार जणांच्या घरात आजही वेळ थांबलेली आहे.
कुणाच्या घरात अजूनही दाराशी रिकामी पडलेली चप्पल आहे.
कुणाच्या घरात अर्धवट राहिलेली जबाबदारी आहे.
कुणाच्या घरात “आता पुढे काय?” हा प्रश्न आहे — ज्याचं उत्तर कुणाकडेच नाही.
त्या चार जणांकडे पैसा नव्हता, पद नव्हतं, मोठं नाव नव्हतं.
पण त्यांच्याकडे कुटुंब होतं.
स्वप्नं होती.
आणि उद्याची भीतीही होती — जी आता खरी झाली आहे.
मोठं नाव मेलं तर देश हळहळतो. सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा पूर येतो, चर्चासत्रं रंगतात.
पण सामान्य माणूस मेला तर त्याच्या घरच्यांना “सावर” असं सांगून जग पुढे निघून जातं.
मरण सगळ्यांचं सारखंच असतं.
पण इथे दुःखालाही वर्ग आहे.
हा फरक अपघाताचा नाही.
हा फरक आपल्या संवेदनशीलतेचा आहे.
आपण कुणासाठी रडतो आणि कुणाला विसरतो — हे आपलं समाज म्हणून अपयश आहे.
आज RIP एका माणसासाठी आहे, पण उद्या आपण किंवा आपले कोणीही त्या “उरलेल्या चारांपैकी” असू.
म्हणून प्रश्न मृत्यूचा नाही.
प्रश्न आहे माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा.
कारण मृत्यू सगळ्यांना समान आहे,
पण माणुसकी अजूनही समान नाही…!