सावंतवाडी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीनंतर नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले सध्या रजेवर असल्याने पालिकेचा कारभार नेमका कोणाच्या हाती आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. उपनगराध्यक्ष अॅड. निरवडेकर यांच्याकडे प्रत्यक्ष चार्ज दिला आहे का, याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी पत्रकार परिषदेत केला. शहरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, उभाबाजार परिसरात अनेक घरांत गेल्या तीन दिवसांपासून पाणी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण स्वच्छता आणि नगरसेवकांचा संपर्क नसल्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत, या कालावधीत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
सिंधुदुर्ग दि.२७: कोकणच्या लाल मातीतील लोकसंस्कृती आणि देवभक्तीचा अनोखा संगम म्हणजे येथील ‘गावरहाटी’. गोव्यापासून रत्नागिरीपर्यंत पसरलेल्या या बारापाच देवस्थानच्या जत्रोत्सवांना कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमेपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि शिस्तीचा एक पुरातन नमुना म्हणून या जत्रोत्सवांकडे पाहिले जाते. याबाबतची माहिती मळगाव येथील देवस्थानची जाणकार शामसुंदर राऊळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे.गावरहाटीची त्रिसूत्री आणि सामाजिक संरचना कोकणातील ग्रामरचनेत ‘बारापाच’ देवस्थानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधिभौतिक, आधिदैविक आणि आधिआध्यात्मिक ताळमेळ राखण्यासाठी ही व्यवस्था पूर्वापार चालत आली आहे. यामध्ये राजसत्ता, पूर्वसत्ता, कुळकर, स्थळकर आणि भूमीचा मूळ मालक महार अशा पाच महत्त्वाच्या घटकांचा समन्वय असतो. श्री देव रवळनाथ हे या बारापाच देवस्थानचे ‘राजसत्ताप्रमुख’ मानले जातात.
शिस्त आणि सीमांचे अनोखे समीकरण कोकणातील जत्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे गावागावांतील परस्पर समन्वय. एका गावात रवळनाथाची जत्रा असताना, त्याच्या सीमेला लागून असलेल्या दुसऱ्या गावात त्याच वेळी जत्रा नसते. इतकेच नव्हे, तर शेजारच्या गावात उत्सव सुरू असताना सीमेवरील गावकरी आपल्या देवाचा ‘प्रसाद’ किंवा ‘कौल’ लावत नाहीत. “आज देवाचे सुकृत तत्व शेजारच्या गावी गेले आहे,” अशी यामागची उदात्त भावना असते.
वेंगुर्ले येथे सोमवती अमावास्येला होणारे समुद्रस्नान असो किंवा मळगाव-सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीची प्रसिद्ध ‘लोटांगण’ जत्रा, या सर्व ठिकाणी शिस्तीचे पालन काटेकोरपणे केले जाते. जोपर्यंत स्थानिक मुख्य देवतांचे स्नान होत नाही, तोपर्यंत इतर गावांतील तरंग किंवा पालख्या समुद्रात प्रवेश करत नाहीत.
दशावतार: जत्रांचे मुख्य आकर्षण कोकणी जत्रेचा प्राण म्हणजे ‘दशावतार’ नाट्य. श्रीगणेश पूजन आणि शंकासुर वधाच्या कथानकाने सुरू होणारे हे नाटक उत्तरार्धात रामायण-महाभारतातील आख्यानांनी रंगते. पालखी प्रदक्षिणा, झांज-मृदंगाचा ताल आणि शार्दूलविक्रीडित श्लोकांच्या गजरात होणारा हा उत्सव भक्तांना मंत्रमुग्ध करतो.
शेकडो वर्षांची अखंड परंपरा आदिलशाही, निजामशाही आणि इंग्रज राजवटीतही ही गावरहाटी आणि त्यातील नीतिमत्ता तसूभरही ढळली नाही. “कोकणपुराधिनाथ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव रवळनाथाप्रती असलेली ही श्रद्धा आजही कोकणी माणसाला एकत्र बांधून ठेवते. वर्षातून एकदा होणाऱ्या या जत्रेत नारळ आणि पाच केळी अर्पण करून कृतकृत्य होणारा कोकणी माणूस, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली ही संस्कृती आजही तितक्याच निष्ठेने जपत आहे.
सावंतवाडी दि.२७ कोकण रेल्वेच्या ‘सावत्र’ कारभाराविरोधात कोकणात संताप व्यक्त होत आहे. सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम, राजधानी व गरीब रथचे थांबे रद्द करणे आणि अमृत भारत योजनेत कोकणातील स्थानकांना डावलणे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. २७ जानेवारी रोजी बेलापूर येथील बैठकीकडे सर्वांचे लक्ष असून, सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या ‘सावत्र’ कारभाराविरोधात संताप; सावंतवाडी टर्मिनस, राजधानी थांबा आणि अमृत भारत योजनेचा मुद्दा ऐरणीवर
कोकण रेल्वेसाठी जमिनी देणाऱ्या कोकणवासीयांनाच आज आपल्या हक्कासाठी लढावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे महामंडळाच्या कथित ‘सावत्र’ कारभाराविरोधात कोकणात तीव्र असंतोष व्यक्त होत असून, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम, राजधानी व गरीब रथ एक्सप्रेसचे थांबे आणि अमृत भारत योजनेतील दुर्लक्ष या मुद्द्यांवरून नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाले असतानाही, आज टर्मिनसच्या अस्तित्वावरच पुरावा मागितला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात सावंतवाडी स्थानकातून राजधानी व गरीब रथचे थांबे अचानक रद्द करण्यात आले, मात्र माहिती अधिकारात विचारणा केली असता “रेकॉर्ड उपलब्ध नाही” असे उत्तर देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.२७ जानेवारी रोजी बेलापूर येथील बैठकीकडे सर्वांचे लक्ष असून, सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे.
सावंतवाडी दि.२६ सावंतवाडी नगर परिषदेच्या ध्वजारोहणाचा मान तब्बल चार वर्षानंतर नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांना मिळाला. त्यांच्या हस्ते 77 व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी ध्वजारोहण पार पडले. सावंतवाडी नगर परिषदेवर गेली चार वर्षे प्रशासक होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये उप नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे ऍड अनिल निरवडेकर यांची बहुमताने निवड झाली. दरम्यान नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले या मॅटर्निटी रजेवर गेल्यामुळे त्यांचा कार्यभार उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आणि यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान त्यांना मिळाला. ध्वजारोहणाच्या या सोहळ्यासाठी ऍड अनिल निरवडेकर यांनी गुलाबी फेटा बांधून ध्वजारोहण केले. अत्यंत शिस्तबद्ध रित्या झालेल्या या कार्यक्रमासाठी सावंतवाडी चे आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय सावंतवाडी नगर परिषदेचे नगरसेवक सुधीर आडीवरेकर प्रतीक बांदेकर,आनंद नेवगी तौकीर शेख यांच्यासह नगरसेविका दिपाली भालेकर अॅड सायली दुभाषी मोहिनी मडगावकर आनंद नेवगी स्नेहा नाईक सुनिता पेडणेकर नीलम नाईक आधी सह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सावंतवाडी दि.२६ सावंतवाडी शहरातील गांधी चौकातील रोटरी क्लब च्या ध्वजारोहणाचा मान यंदाही विनय काणेकर यांना मिळाला. या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर नगरसेवक सुधीर आडीवरेकर आनंद नेवगी प्रतीक बांदेकर अजय गोंदावळे तौकीर शेख,ऍड सिद्धार्थ भांबुरे,नगरसेविका दिपाली भालेकर शर्वरी धारगळकर मोहिनी मडगावकर सुनिता पेडणेकर ऍड सायली दुभाषी दुलारी रांगणेकर आधी उपस्थित होते. कांता काणेकर यांनी ही परंपरा सुरू केली असून गांधी चौकाच्या बरोबर मधोमध प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी रोटरी क्लबच्या वतीने ध्वजारोहण केले जाते. सुरुवातीला विनय काणेकर यांनी आमदार केसरकर आणि प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ध्वजारोहण झाले राष्ट्रगीताच्या धुन नंतर महाराष्ट्र गीताने ध्वजारोहणाची सांगता झाली.
सावंतवाडी दि. २६ तालुक्यातील मळगाव येथे भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार संदीप गावडे आणि मळगाव-नेमळे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार गौरव मुळीक यांच्या प्रचारार्थ श्री देव मायापूर्वाचारी मंदिरात श्रीफळ ठेवून विजयाचे साकडे घालण्यात आले.प्रचाराच्या शुभारंभावेळी महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येऊन भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता प्रस्थापित व्हावी, असे गाऱ्हाणे मायापूर्वचारी चरणी घालण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता. देवदर्शनानंतर उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:हनुमंत पेडणेकर (सरपंच, मळगाव)गणेशप्रसाद पेडणेकर (माजी सरपंच तथा भाजप शक्ती केंद्रप्रमुख)चंद्रकांत जाधव (भाजप जिल्हा सरचिटणीस)निलेश कुडव (माजी सरपंच)सिद्धेश तेंडोलकर (भाजप सावंतवाडी तालुका चिटणीस)ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, निकिता राऊळ, बूथ अध्यक्ष महेश गवंडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मळगाव येथील ब्राम्हण पाट परिसरातील वाड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली. दोन्ही उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. “युती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि भविष्यातील संकल्प” मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
सावंतवाडी :दि.२६ सावंतवाडी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांनी आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला संविधान दिले. 26 जानेवारी 1950 रोजी ते देशात अंमलात आणण्यात आले आणि आपला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. 77 व्या प्रजासत्ताक दिनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. यावेळी समाज मंदिर परिसरातील परिसरातील नागरिक आणि रहिवासी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी दि.२६. सावंतवाडी येथील पोलीस परेड मैदानावर 77 वा प्रजासत्ताक दिन प्रांताधिकारी समीर घारे यांच्या हस्ते ध्वजवंदनाने साजरा झाला यावेळी कमांडिंग ऑफिसर म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी परेडचे नेतृत्व केले. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील तसेच माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले स्वातंत्र सैनिक अण्णा केसरकर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग दर्शवला. यावेळी शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज उर्दू इंग्लिश स्कूल तसेच एनसीसी पथकाने संचलनात सहभाग घेतला या संचलनात सावंतवाडी पोलीस पथकही सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले यावेळी नायब तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज चॅनल ची ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ‘सत्य सामर्थ्य आणि संकल्प’ ही टॅग लाईन घेऊन या तत्त्वावर चालण्याचे व्रत घेऊन चॅनेलची सुरुवात करत आहोत. यामध्ये ज्ञान मनोरंजन आणि ताज्या बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे देशभराच्या बातम्या बरोबर सत्य घटना या निमित्ताने आपणासमोर आणत असताना अखंड हिंदुस्थानचा प्रचारक होऊ इच्छित आहोत.
आपला हिंदुस्तान देश जात धर्म भाषा प्रांत मध्ये विभागला जाऊ शकत नाही सर्वधर्म समभाव मानणारा आपला देश आहे या देशाची कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय स्थिती अधिक उजळ व्हावी प्रांताप्रांतामध्ये समृद्धी यावी घराघरांमध्ये लक्ष्मीची पावले यावीत अशी मनोकामना व्यक्त करत असताना सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करत अखंड हिंदुस्तान लाईव्ह सुरू करत आहोत. या यूट्यूव चैनलची सुरुवात कोकण आणि महाराष्ट्रापासून करत असताना काश्मीर ते कन्याकुमारी पर्यतच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि बातम्यांचाही यामध्ये समावेश असेल. ‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’! याचा आम्हाला अभिमान आहे.
कवी वसंत सावंत यांची ‘अशा लाल मातीत जन्मास यावे’ ही कविता कोकणच्या भूमीचे सौंदर्य, तिथला निसर्ग आणि तिथल्या माणसांचे कष्टकरी जीवन यांचे अत्यंत प्रभावी दर्शन घडवते. ‘अशा लाल मातीत जन्मास यावे’या कवितेतून कवी वसंत सावंत यांनी अशा लाल मातीत जन्मास यावे जिथे रावणार्यास मान मिळावा अशा घाम-घामानं भिजल्या शरीरी नव्या अस्मितेचा प्रकाश मिळावा. अशा तृप्त मातीत जन्मास यावे. अशा कष्टकऱ्यांच्या पवित्र कुळी पुन्हा एकदा मी जन्मास यावे. असे सांगतात.
कवी वसंत सावंत यांच्या ‘स्वस्तिक’ या काव्यसंग्रहातील कवितेच्या ओळी आणि त्याचा अर्थ खूप काही सांगून जातो. कवी वसंत सावंत यांनी कोकणची अस्मिता ही कविता कोकणच्या लाल मातीचा आणि तिथल्या संस्कृतीचा गौरव करते. श्रमाची पूजा करते. निसर्ग वर्णनात माड-पोफळी (नारळ-सुपारीच्या बागा), समुद्र आणि सह्याद्रीच्या कड्यांचे सुंदर चित्रण करते अगदी त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्तान लाईव्ह चॅनल त्यांच्या काव्यार्थीला अभिप्रेत असे काम करू पाहत आहे. कोकणची जशी लाल माती तशी देशावरची काळी आई ! रंग वेगळा परंतु गुणधर्म एकच, सोन पिकवणे. अशा मातीशी प्रामाणिक राहून कष्टकरी बळीराजाच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या व्यथा मांडण्याचे काम आम्ही करणार आहोत.
‘जय जवान जय किसान’ चा नारा घेऊन अखंड हिंदुस्थान लाईव्ह न्युज चॅनल सुरू होत आहे. सीमेवर लढणारा जवानांचा जय जयकार करत असताना मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचाही जय जयकार व्हायला हवा. अगदी छोट्या बालकांपासून तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आवडेल रुचेल असा अखंड हिंदुस्थान लाईव्ह न्युज असेल. असत्यावर आसूड, सामथ्याची जाणीव आणि सुख-समृद्धीचा संकल्प घेऊन अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्युज चॅनल आपणांसमोर येत आहे.
चला तर मग बेल आयकॉनवर बटन दावा आणि चॅनल सबस्क्राईब करा.