24.7 C
New York
Saturday, June 6, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 68

कोलगावात सत्तेच्या हुकूमशाहीला जनताच सुरुंग लावणार!

कोलगाव जिल्हा परिषद अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांच्या प्रचारात ग्रामस्थ व मतदारांचा मोठा सहभाग

मायकल डिसोजा यांचा सत्ताधाऱ्यांना खणखणीत इशारा

सावंतवाडी दि.०१: कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या सुरू असलेली सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही आणि घराणेशाही आता संपुष्टात येईल. सत्तेचा अहंकार झालेल्यांचा भ्रमाचा भोपळा येत्या ७ तारखेला जनताच फोडेल, असा घणाघाती प्रहार मायकल डिसोजा यांनी केला आहे. कोलगाव येथील निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

घराणेशाही आणि सत्तेच्या गैरवापरावर प्रहार
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मायकल डिसोजा यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत.

कर्मचाऱ्यांचा राजकीय वापर: जिल्हा बँक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असून, ही लोकशाहीसाठी घातक असलेली हुकूमशाही आहे.

घराणेशाहीवर निशाणा: “सध्या सर्वच पदे एकाच घरात एकवटली आहेत, अजून किती पदे यांना हवी आहेत?” असा सवाल करत त्यांनी सत्तेच्या केंद्रीकरणावर टीका केली.

परिवर्तनाचा निर्धार: सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना ही निवडणूक महाग पडणार असून, जिल्हा परिषदेवर जाण्याचे सत्ताधाऱ्यांचे स्वप्न अधुरेच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“सत्तेचा अहंकार झालेल्यांना धडा शिकवण्यासाठी आता सामान्य जनता सज्ज झाली आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेचा आशीर्वाद घ्यावा, परिवर्तनाची लाट आता थोपवता येणार नाही.” — मायकल डिसोजा

प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोलगाव मतदारसंघात मायकल डिसोजा यांच्या घरोघरी सुरू असलेल्या प्रचाराला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सत्तेच्या गैरवापराविरुद्ध जनमानसात असलेला रोष पाहता, या मतदारसंघात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे. डिसोजा यांनी फुंकलेल्या या ‘परिवर्तनाच्या रणशिंगामुळे’ निवडणुकीचे रणांगण आता चांगलेच तापले आहे.

 

आरोंदा मतदारसंघात सुदन कवठणकरांचे ‘मोठे’ शक्तिप्रदर्शन

आरोंदा मतदारसंघात सुदन कवठणकरांच्या समर्थनार्थ उपस्थित   जनसमुदाय

देव रवळनाथाचा आशीर्वाद घेत प्रचाराचा धडाका!

सावंतवाडी दि.०१: आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वारे वेगाने वाहू लागले असून, शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. सातार्डा येथील श्री देव रवळनाथाचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. यावेळी कार्यकर्त्यांचा अफाट उत्साह आणि ग्रामस्थांच्या प्रचंड गर्दीने विरोधकांचे धाबे दणाणले असून, कवठणकर विजयाकडे कूच करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

विकासाचा अजेंडा आणि विरोधकांना चपराक
प्रचारादरम्यान बोलताना सुदन कवठणकर यांनी अत्यंत संयमी पण आक्रमक भूमिका मांडली. वैयक्तिक टीकेला उत्तर न देता त्यांनी थेट विकासाच्या मुद्द्यांना हात घातला.

कामाची पावती: “माझे कामच निवडणुकीनंतर बोलेल,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

प्रमुख आश्वासनं: मतदारसंघातील प्रलंबित रस्ते, आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारणे आणि स्थानिक बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देणे ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सातार्डा आणि आरोंदा परिसरात सध्या केवळ कवठणकर यांच्याच नावाची चर्चा आहे. गावागावात होणाऱ्या कोपरा सभा आणि भेटीगाठींना मिळणारा प्रतिसाद पाहता, ते या निवडणुकीत ऐतिहासिक लीड घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वसामान्यांचा हा पाठिंबा पाहून विरोधकांच्या गोटात मात्र कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

महायुतीची वज्रमूठ
या प्रचार दौऱ्यात महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, स्थानिक सरपंच आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. “जनतेने आता विकासाच्या बाजूने कौल देण्याचे निश्चित केले आहे,” असा विश्वास यावेळी स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला.

एकूणच, आरोंदा मतदारसंघातील सुदन कवठणकर यांचा हा झंझावात विरोधकांचे अस्तित्व धोक्यात आणणारा ठरत असून, निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोंदा मतदारसंघात सुदन कवठणकरांचे पारडे जड उपस्थित जनसमुदाय

आंबोलीत ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का

आंबोली येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे सेनेमध्ये प्रवेश देताना जिल्हाप्रमुख संजू परब सोबत राजेश मोरे, दिनेश गावडे, मायकल डिसोजा, विलास गावडे, जगन्नाथ गावडे, अरुण गावडे आदी

अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश

सावंतवाडी दि.०१:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आंबोली परिसरात मोठा धक्का बसला असून, ठाकरे शिवसेना गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या हस्ते तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आंबोली जिल्हा परिषद गटातील ठाकरे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख बुधाजी पाताडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर, निधी गुरव, राजा गुरव, रामचंद्र आमडोस्कर, निखिल गुरव, जी. जी. राऊत, गोविंद जाधव, संजय राऊत, सुनील राऊत, शोभना राऊत, रिया पाताडे, संजय पडते, बाबुराव शेळके, लक्ष्मण जाधव, कांता गुरव, अनिल मेस्त्री, केशव जाधव आदी उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे आंबोलीसह संपूर्ण जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद वाढली आहे. प्रवेशानंतर बोलताना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले की, शिवसेनेची विचारधारा, संघटनशक्ती आणि विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून कार्यकर्ते पक्षात दाखल होत आहेत. आगामी काळात शिवसेना अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पक्ष निरीक्षक राजेश मोरे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, पंचायत समितीचे उमेदवार मायकल डिसोजा, विभाग प्रमुख विलास गावडे, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, अरुण गावडे, नंदू गावडे, विशाल बांदेकर, उत्तम नार्वेकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसला असून, आंबोली परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंबोली येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे सेनेमध्ये प्रवेश देताना जिल्हाप्रमुख संजू परब सोबत राजेश मोरे, दिनेश गावडे, मायकल डिसोजा, विलास गावडे, जगन्नाथ गावडे, अरुण गावडे आदी

२४ वर्षांची प्रतीक्षा संपली, पण ‘गळक्या’ नशिबाचे काय?

विलवडे गावातून वाहणारे तिलारी कालव्याचे पाणी

विलवडे गावात पाणी पोहोचले, मात्र गळतीमुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती!

सावंतवाडी दि.०१: गेल्या दोन तपांपासून (२४ वर्षे) ज्या क्षणाची विलवडे आणि सरमळेवासीय वाट पाहत होते, तो क्षण अखेर उजाडला. तिलारीच्या बांदा शाखा कालव्याचे पाणी या दोन्ही गावात पोहोचले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या आनंदाला ‘गळती’चे ग्रहण लागले असून, कालव्याच्या निकृष्ट आणि अर्धवट कामामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

पाणी तर आले, पण टिकणार कसे?
प्रशासनाने कालव्यात पाणी सोडले असले तरी कालव्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक ठिकाणी कालव्याला मोठी भगदाडे पडली आहेत, तर काही ठिकाणी पाणी पाझरून वाया जात आहे. “दरवर्षी प्रशासन केवळ पाणी सोडल्याचे सोपस्कार पार पाडते, पण फुटलेल्या कालव्यामुळे हे पाणी शेवटपर्यंत पोहोचणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांची ‘हरितक्रांती’ कागदावरच!
गेल्या दोन दशकांत अनेक निवडणुका झाल्या आणि अनेक लोकप्रतिनिधींनी या भागात ‘हरितक्रांती’ घडवून आणण्याची स्वप्ने दाखवली. प्रत्यक्षात मात्र कालव्याचे काम आजही रेंगाळलेलेच आहे. केवळ पाणी सोडून श्रेयाचे राजकारण करण्यापेक्षा, कालव्याची कायमस्वरूपी दुरुस्ती का केली जात नाही? असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:

कायमस्वरूपी दुरुस्ती: कालव्याच्या गळतीचे सर्वेक्षण करून तत्काळ सिमेंट कॉंक्रिटीकरण करावे.

अर्धवट कामे पूर्ण करा: शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी अडथळे दूर करावेत.

प्रशासकीय उत्तरदायित्व: कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी.

“२४ वर्षांनंतर पाणी गावात आले याचा आनंद आहे, पण हा आनंद क्षणभंगुर ठरू नये. सरकारने फक्त आश्वासने न देता कालवा दुरुस्त करावा, तरच आमच्या कष्टाचे सोने होईल.” — स्थानिक शेतकरी, विलवडे.

 

संत रोहिदास महाराज अखिल समाजाचे संत; जयंती गावागावांत प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा एकमताने निर्णय

सावंतवाडी येथे संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करताना जिल्हा कार्याध्यक्ष बाबुराव चव्हाण सोबत डॉ शरद जाधव गणेश म्हापणकर जगदीश चव्हाण नरसु रेडकर कल्याण कदम आदी

सावंतवाडीत चर्मकार उन्नती समाज मंडळाच्या वतीने 650 वी जयंती साजरी

सावंतवाडी दि.०१:
संत श्रेष्ठ सद्गुरू रोहिदास महाराज हे केवळ चर्मकार समाजाचेच नव्हे, तर अखिल समाजाचे संत होते. उच्च-नीच असा कोणताही भेद नसून सर्व माणसे समान आहेत, ही शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे यापुढील संत रोहिदास महाराजांची जयंती गावागावांत, वाडी-वस्तीवर सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन, प्रबोधनात्मक स्वरूपात साजरी करावी, असा एकमताने ठराव सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेच्या वतीने आयोजित संत रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती उत्सवानिमित्त मांडण्यात आला.
ही जयंती सावंतवाडी येथील समाज मंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रमाणे भव्य स्वरूपात साजरी व्हावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या भूमिकेला सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने सहमती दर्शविण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. शरद जाधव होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, समाजाने जातीपातीच्या बंधनांचे दुष्परिणाम अनुभवले आहेत. भविष्यात संत रोहिदास महाराजांचे विचार अंगीकारून त्यांची जयंती समाजबांधवांमध्ये व्यापक स्वरूपात साजरी केली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव जगदीश चव्हाण यांनी केले. त्यांनी ८ फेब्रुवारी रोजी इन्सुली येथे संत रोहिदास जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच सांगेली व कोलगाव येथेही जयंती उत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी संत रोहिदास महाराजांचे गाढे अभ्यासक पी. बी. चव्हाण यांनी संत रोहिदास यांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शूद्र व अतिशूद्रांना देखील परमेश्वराच्या भक्तीचा पूर्ण अधिकार आहे, हे संत रोहिदासांनी ठामपणे मांडले. जगात कोणी लहान-मोठा नाही, सर्व समान असून सर्वांना पोटभर अन्न मिळेल, असे सुखी राज्य असावे, अशी त्यांची संकल्पना होती. त्यांच्या विचारांनी तत्कालीन राजे-महाराजेही प्रभावित झाले होते आणि त्यामुळे त्यांना धर्मगुरूचा मान मिळाला होता, असेही त्यांनी नमूद केले.
अभिवादनपर भाषणात पी. बी. चव्हाण म्हणाले की, संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी समता, बंधुता व आत्मसन्मानाचे धडे दिले असून ते केवळ एका जातीपुरते मर्यादित नसून पुरोगामी विचारांचे व्यापक व्यासपीठ होते. संत रोहिदास महाराजांचा पाठ्यपुस्तकांत समावेश व्हावा तसेच शाळांमधून त्यांची जयंती साजरी करण्याबाबत शासनाने दिलेल्या आदेशांची योग्य अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष बाबुराव चव्हाण यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तालुका उन्नती मंडळाचे प्रभारी अध्यक्ष तथा वेंगुर्ले पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. शरद जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक कल्याण कदम, सचिव जगदीश चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष बाबुराव चव्हाण, जिल्हा सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरसू रेडकर, तालुका सहसचिव राजेश फोंडेकर, जिल्हा मार्गदर्शक निवृत्त उपशिक्षणाधिकारी पी. बी. चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष व निवृत्त कर्मचारी गणेश म्हापणकर, तालुका सहसचिव संजय बांबुळकर, तालुका सदस्य संभाजी कांबळे, निवृत्त एसटी कर्मचारी विजय ओटवणेकर, संदीप बिबवणेकर, वेंगुर्ले कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, तालुका मार्गदर्शक लक्ष्मण आरोसकर, सूर्यकांत सांगेलकर तसेच बांदा येथील सुधाकर बांदेकर, माडकर आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण हे अपरिहार्य कारणामुळे अनुपस्थित राहिल्याने अध्यक्षपदाचा मान उपाध्यक्ष डॉ. शरद जाधव यांना देण्यात आला.

नेरूर देऊळवाडा येथे “१० खोके एकदम ओक्के” असा थेट आणि बोचरा मजकूर असलेले बॅनर्स

नेरुरपार येथे लावण्यात आलेले हेच ते बॅनर

मनसेने सत्ताधारी गटावर अप्रत्यक्ष चढवला हल्ला; नेरूर  मतदारसंघात लागलेले बॅनर्सची चर्चा.

सिंधुदुर्ग दि.०१: कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लावलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “१० खोके एकदम ओक्के” असा थेट आणि बोचरा मजकूर असलेले बॅनर्स झळकवत मनसेने सत्ताधारी गटावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे.
विशेष म्हणजे, कालच नेरूर येथील सरपंच व उपसरपंचांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या राजकीय घडामोडीनंतर अवघ्या काही तासांतच मनसेने मैदानात उतरत “विकास महत्त्वाचा आहे” अशी टॅगलाईन देत सरपंच-उपसरपंच असं लिहीलेल्या दोन खुर्च्यांचे प्रतीकात्मक फोटो असलेले बॅनर्स लावले आहेत. त्या खाली ठळक अक्षरांत “१० खोके एकदम ओक्के” असा उल्लेख करण्यात आला आहे.
नेरूरमधील तीन ते चार प्रमुख ठिकाणी हे बॅनर्स झळकले असून, त्यामुळे गावासह संपूर्ण तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या बॅनर्समधून नेमका कोणता संदेश दिला जात आहे, यावर विविध तर्कवितर्क लढवले जात असून, सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर मनसेने केलेली ही खेळी महत्त्वाची मानली जात आहे.दरम्यान, या प्रकरणावर संबंधित राजकीय पक्षांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी नेरूरच्या राजकारणात मात्र वातावरण चांगलेच तापले आहे.

कणकवली उड्डाणपुलावर टायर फुटल्याने कार पलटी

महामार्गावर पलटी झालेली कार

पाच पर्यटक सुदैवाने बचावले

कणकवली दि.०१: मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली उड्डाणपुलावर आज रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. धावत्या कारचा टायर अचानक फुटल्याने कार अनियंत्रित होऊन पलटी झाली. या अपघातात कारमधील पाचही प्रवासी सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याला सहलीसाठी आलेले पर्यटक आपल्या कारने मुंबईच्या दिशेने परतत होते. दुपारी सव्वा अकराच्या सुमारास त्यांची कार कणकवली उड्डाणपुलावरील ‘पल्लवी लॉज’च्या समोर आली असता, अचानक कारचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार जोरात संरक्षक कठड्याला (बॅरिकेड्स) धडकून महामार्गावरच पलटी झाली.

एअरबॅगमुळे वाचले प्राण
हा अपघात इतका भीषण होता की कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने अपघाताच्या वेळी कारमधील दोन्ही एअरबॅग वेळेत उघडल्या गेल्या. यामुळे कारमधील पाचही प्रवाशांना मोठी दुखापत झाली नाही आणि त्यांचे प्राण वाचले.

पोलिसांकडून तातडीची मदत
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, महामार्ग वाहतूक पोलीस हर्षल खडपकर, योगेश लाड, आणि दत्तात्रय राऊत यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. अपघातग्रस्त कार बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

 

संत शिरोमणी रोहिदास महाराज: समता, श्रम आणि ‘बेगमपुरा’ स्वप्न पाहणारा महामानव

 ऐतिहासिक संदर्भासह, संत रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त परशुराम बाळाराम चव्हाण यांचा एक ‘विशेष लेख’

मध्ययुगीन भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहासात ज्या महापुरुषांनी विषमतेच्या भिंती ओलांडून मानवतेचा झेंडा फडकवला, त्यामध्ये संत शिरोमणी रोहिदास (रविदास) महाराज यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आज त्यांची ६५० वी जयंती. माघ शुद्ध पौर्णिमेला जन्मलेल्या या क्रांतीकारक संताने केवळ भक्तीचा मार्ग सांगितला नाही, तर ‘माणूस’ केंद्रस्थानी ठेवून समतावादी समाजाची मांडणी केली.

१. जन्मापेक्षा कर्माचे श्रेष्ठत्व
ज्या काळात माणसाची किंमत त्याच्या जन्मावरून आणि जातीवरून ठरवली जात होती, त्या काळात रोहिदास महाराजांनी ठणकावून सांगितले की, “माणूस जन्माने नव्हे, तर त्याच्या कर्माने मोठा होतो.” चर्मोद्योगाचा व्यवसाय करत असताना त्यांनी कधीही न्यूनगंड बाळगला नाही. उलट, “काबाडकष्ट करून मिळवलेली भाकरी हीच खरी देवाची प्रसादी” हा विचार देऊन त्यांनी श्रमप्रतिष्ठेचा गौरव केला.

२. ‘बेगमपुरा’: जगातील पहिले समतावादी स्वप्न
पाश्चात्य जगातील ‘यूटोपिया’ या संकल्पनेच्या कित्येक वर्षे आधी संत रोहिदासांनी ‘बेगमपुरा’ ही संकल्पना मांडली.

“ऐसा चाहू राज मे जहा मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसै, रैदास रहे प्रसन्न॥”

असे शहर जिथे कोणताही ‘गम’ (दुःख) नाही, जिथे कोणी उपाशी नाही, जिथे उच-नीच भेदभाव नाही आणि जिथे सर्वांना समान स्वातंत्र्य आहे, अशा आदर्श राज्याची कल्पना त्यांनी आपल्या काव्यातून मांडली.

३. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंतःशुद्धी
“मं चंगा तो कठौती में गंगा” हा त्यांचा विचार म्हणजे अंधश्रद्धेवर केलेला मोठा प्रहार आहे. देव मंदिरात, मशिदीत किंवा तीर्थक्षेत्री नसून तो तुमच्या शुद्ध आचरणात आणि प्रामाणिक कामात आहे, हे त्यांनी समाजाला पटवून दिले. त्यांनी कर्मकांडापेक्षा ‘मानस पूजेला’ महत्त्व दिले, जिथे मन हेच मंदिर आणि सत्य हाच धूप मानला गेला.

४. वैश्विक प्रभाव आणि शिष्यपरंपरा
संत रोहिदासांच्या विचारांची प्रगल्भता एवढी अगाध होती की:

गुरू ग्रंथ साहिब: शिखांच्या या पवित्र ग्रंथात त्यांच्या ४० पदांचा समावेश करण्यात आला आहे.

मीराबाई: चितोडची राणी मीराबाई यांनी रोहिदासजींना आपले आध्यात्मिक गुरू मानले, जे त्या काळातील सामाजिक क्रांतीचे मोठे उदाहरण होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ‘The Untouchables’ या ग्रंथाची अर्पणपत्रिका संत रोहिदासांना समर्पित केली, यावरूनच त्यांच्या विचारांची आधुनिक भारतासाठी असलेली व्यापकता स्पष्ट होते.

५. आजच्या काळातील प्रासंगिकता
आजच्या स्पर्धात्मक युगात रोहिदास महाराजांचे विचार हे ‘लाईटहाऊस’प्रमाणे काम करतात. जाती-पातींच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांचा हा संदेश आजही महत्त्वपूर्ण आहे:

“जाति-जाति में जाति हैं, जो केतन के पात, रैदास मनुष ना जुड़ सके जब तक जाति न जात।”

निष्कर्ष: संत रोहिदास महाराज हे केवळ एका समाजाचे दैवत नसून ते संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी शिकवलेली श्रमप्रतिष्ठा, बंधुभाव आणि समता हीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची मुळे आहेत. त्यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना, त्यांनी स्वप्नात पाहिलेले ‘बेगमपुरा’ (समतावादी समाज) प्रत्यक्षात उतरवणे, हीच त्यांच्यासाठी खरी मानवंदना ठरेल.- विनम्र अभिवादन!

🚩 समतेचा महामेरू: संत शिरोमणी रोहिदास महाराज 🚩

आज माघ पौर्णिमा! मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या, जातीभेदाच्या भिंती पाडणाऱ्या आणि श्रमालाच ईश्वर मानणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास (रविदास) महाराज यांची ६५० वी जयंती.

त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतीकारी विचारांचा हा अल्पसा आढावा…

✨ १. “मं चंगा तो कठौती में गंगा”
भक्ती म्हणजे केवळ मंदिरातील पूजाअर्चा नव्हे, तर अंतःकरणाची शुद्धता होय. जर तुमचे मन शुद्ध असेल आणि तुमचे काम प्रामाणिक असेल, तर तुमच्या कामाच्या पात्रातच (कठौती) गंगा अवतरते. हा विचार देऊन त्यांनी कर्मकांडापेक्षा कर्माला महत्त्व दिले.

✨ २. श्रमाला मिळाली प्रतिष्ठा
रोहिदास महाराजांनी आपला चर्मोद्योगाचा व्यवसाय कधीही सोडला नाही. “कोणतेही काम लहान नसते, तर ते करण्याची पद्धत प्रामाणिक असावी,” असे ते म्हणत. आजच्या भाषेत सांगायचे तर, ते ‘श्रमप्रतिष्ठेचे’ पहिले उद्गाते होते.

✨ ३. बेगमपुरा: एक स्वप्नवत समाज
पाश्चात्य विचारवंतांच्या खूप आधी महाराजांनी अशा एका शहराची कल्पना मांडली जिथे: ❌ भीती नाही (बे-गम) ❌ भेदभाव नाही ❌ गरिबी नाही ❌ कोणीही उपाशी नाही असा ‘बेगमपुरा’ म्हणजेच आजच्या लोकशाहीचा मूळ आधार आहे.

✨ ४. वैश्विक मान्यता
त्यांच्या विचारांची ताकद इतकी मोठी होती की, शिखांच्या पवित्र ‘गुरू ग्रंथ साहिब’ मध्ये त्यांच्या ४० पदांचा समावेश करण्यात आला. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘The Untouchables’ ग्रंथाद्वारे महाराजांच्या कार्याला आदरांजली वाहिली आहे.

📜 महाराजांचे अमर विचार:

“जाति-जाति में जाति हैं, जो केतन के पात, रैदास मनुष ना जुड़ सके जब तक जाति न जात।” (अर्थ: जोपर्यंत जातीभेद संपत नाही, तोपर्यंत माणसे खऱ्या अर्थाने एकमेकांशी जोडू शकत नाहीत.)

आजच्या दिवशी आपण संकल्प करूया— जातीभेद मुक्त, समतावादी आणि श्रमनिष्ठ समाज घडवण्याचा!

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! 🙏