सिंधुदुर्ग दि.२८:राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर, आज कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारी महायुतीची जाहीर प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे.आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. कणकवली येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार होते, मात्र अजितदादांच्या निधनामुळे सर्वच राजकीय कार्यक्रम तातडीने स्थगित करण्यात आले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी ही सभा रद्द झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर मोठी शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला गमावल्याच्या भावनेने महायुतीचे सर्वच घटक पक्ष आणि कार्यकर्ते दुःखात बुडाले आहेत.
मुंबई दि.२७: डिजिटल क्रांतीच्या युगात आता चोर तुमच्या खिशाला हात न लावताही पैसे चोरू शकतात. गर्दीच्या ठिकाणी ‘पॉईंट ऑफ सेल’ (POS) मशीनचा वापर करून सायबर ठग तुमच्या खिशातील क्रेडिट किंवा डेबिट कार्ड चोरून स्कॅन करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. वाय-फाय सुविधेमुळे अवघ्या काही सेकंदांत हा व्यवहार पूर्ण होत असून, पीडिताला कळेपर्यंत खात्यातून पैसे कट झालेले असतात.
आजकालच्या बहुतांश कार्ड्समध्ये NFC (Near Field Communication) म्हणजेच वाय-फाय सुविधा असते. यासाठी पिन टाकण्याची किंवा कार्ड मशीनमध्ये स्वाइप करण्याची गरज नसते. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. गर्दीच्या ठिकाणी तुमचं पाकीट ज्या बाजूला आहे, त्याजवळ चोर हळूच POS मशीन नेतात. कार्ड मशीनच्या संपर्कात येताच २-३ सेकंदात व्यवहार पूर्ण होतो.या आधुनिक डिजिटल चोरीपासून वाचण्यासाठी खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे:NFC सुविधा बंद करा: तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲपवर जाऊन ‘कॉन्टॅक्टलेस पेमेंट’ किंवा ‘NFC’ पर्याय तातडीने बंद करा. गरज असेल तेव्हाच तो सुरू करा. मर्यादा (Limit) निश्चित करा: जर तुम्हाला ही सुविधा वापरायची असेल, तर त्याची दैनंदिन मर्यादा १,००० रुपयांपेक्षा कमी सेट करा, जेणेकरून मोठी चोरी टाळता येईल. RFID-Blocking पाकीट वापरा: बाजारात ‘RFID-Blocking Wallet’ किंवा विशेष कार्ड होल्डर मिळतात. यामुळे मशीन तुमच्या कार्डचे सिग्नल पकडू शकणार नाही. कार्ड पाकीटात अशा प्रकारे ठेवा की ते बाहेरील स्पर्श किंवा स्कॅनिंगला लगेच प्रतिसाद देणार नाही.
महत्त्वाची टीप:
सतर्क राहणे आणि तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित ठेवणे, हाच या आधुनिक चोरीपासून वाचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
फसवणूक झाल्यास काय करावे? १. विलंब न करता बँकेला कळवून आपले कार्ड त्वरित Block करा. २. नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर १९३० वर त्वरित संपर्क साधा. ३. ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा.
सिंधुदुर्ग दि.२७: दक्षिण कोकणच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या परिस्थितीत सावंतवाडी येथे टर्मिनस उभारणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य (Feasible) नाही आणि रेल्वेकडे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही, असे स्पष्ट मत प्रशासनाने व्यक्त केले आहे. यामुळे आता या प्रकल्पाचा चेंडू थेट केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या कोर्टात गेला आहे.
कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर यांनी सावंतवाडी टर्मिनसच्या मागणीसाठी पुकारलेल्या उपोषणानंतर, बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या (KRCL) मुख्य कार्यालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (CCM) आशुतोष श्रीवास्तव आणि सिव्हिल विभागाचे एल. प्रकाश यांनी प्रकल्पातील अडचणींची माहिती दिली.टर्मिनससाठी लागणारा निधी प्रचंड असून, कोकण रेल्वेच्या सध्याच्या बजेटमध्ये अशी तरतूद करणे अशक्य आहे.सध्याच्या रचनेत सावंतवाडी स्टेशनचे पूर्ण क्षमतेच्या टर्मिनसमध्ये रूपांतर करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष निधी मिळवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आता राजकीय इच्छाशक्तीची कसोटी प्रशासनाने हात वर केल्यामुळे आता या प्रश्नाला राजकीय वळण मिळाले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार नारायण राणे आणि सुनील तटकरे यांनी हा विषय लोकसभेत लावून धरावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच, मुंबई-ठाणे परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या कोकणी मतदारांच्या जोरावर तेथील खासदारांनीही रेल्वे मंत्रालयावर दबाव निर्माण करणे आवश्यक बनले आहे.
चौकट
सावंतवाडी टर्मिनस का आवश्यक आहे? सावंतवाडी स्टेशनचे टर्मिनसमध्ये रूपांतर झाल्यास दक्षिण कोकणचा चेहरामोहरा बदलू शकतो.सावंतवाडी गाड्यांचे उगमस्थान (Originating point) बनल्यास स्थानिकांना ‘कन्फर्म सीट’ मिळणे सुलभ होईल.सध्या मडगावपर्यंत जाणाऱ्या गाड्या सावंतवाडीत थांबवता येतील, ज्यामुळे गोवा रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होईल.गाड्यांच्या देखभालीसाठी आणि साफसफाईसाठी लागणारी यंत्रणा येथे उपलब्ध झाल्यास नवीन गाड्या सुरू करणे शक्य होईल.या बैठकीत कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत, सुरेंद्र नेमळेकर, गणेश परब, अमित नार्वेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी टर्मिनससह कोकण रेल्वेच्या इतर प्रवाशांच्या समस्यांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्ग दि.२७ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य स्टेजही उभारण्यात येत आहे.
या जाहिर प्रचार सभेला मुख्यमंत्र्यांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांच्यासहीत विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येत आहेत. या निवडणुकांत सर्व जागांवर यश मिळविण्याच्या अनुषंगाने महायुतीने कंबर कसली आहे. गावोगावी प्रचार, नियोजनही जोरदार करण्यात येत आहे. याच प्रचाराच्या अनुषंगाने ही जाहिर प्रचार सभा कणकवलीत होत आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर होणाऱ्या या जाहिर प्रचार सभेच्या अनुषंगाने भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. यात जाहिर प्रचार सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी सत्ताधारी नगरसेवकांवर डागला निशाणा! ❌ निकृष्ट दर्जाचे काम ❌ धुळीचे साम्राज्य ❌ आरोग्याचा प्रश्न
ठेकेदाराला २ दिवसांचा अल्टीमेटम… अन्यथा जनआंदोलन छेडणार! 📢
सावंतवाडी दि.२७ “५७ कोटींच्या योजनेत भ्रष्टाचार? निकृष्ट कामामुळे सावंतवाडीकर धुळीत! सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा महेश पांचाळ यांचा खळबळजनक आरोप आहे.”
👉 दोन दिवसात सुधारणा करा, अन्यथा रस्त्यावर उतरू! 🚨 सावंतवाडीकरांच्या जीवाशी खेळ थांबवा! 🚨
सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या ५७ कोटींच्या नळ पाणी योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि उडालेली धूळ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
📍 महेश पांचाळ यांचे थेट सवाल: ✅ रस्ते खोदून ठेवलेत, मग डांबरीकरण नीट का होत नाहीये? ✅ सत्ताधारी आणि प्रशासन या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक का करत आहेत? ✅ नागरिकांच्या आरोग्याला जबाबदार कोण?असा सवाल सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी केला असून येत्या दोन दिवसांत खड्डे नीट न बुजल्यास आता थेट ‘रस्त्यावर उतरून आंदोलन’ होणार! असा इशारा दिला आहे. ✊🔥
. सावंतवाडी दि.२७ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी अनेक आमिषे दाखवून किंवा इतर मार्गांचा वापर करून निवडणूक अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव आणला जात असून या आमिषाला बळी पडून काही ठिकाणी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. जो पॅटर्न महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान कल्याण डोंबिवली , ठाणे येथे राबविण्यात आला तोच पॅटर्न आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली असून या नव्या पॅटर्न मुळे हळूहळू लोकशाही संपुष्टात येणार असून राजकारणाची वाटचाल हळूहळू हुकूमशाहीच्या दिशेने चालू झाली आहे. सत्तेच्या व पैशाच्या मस्तीत वावरणाऱ्यांनी शह काटशहाच्या राजकारणामुळे लोकशाही संपुष्टात आणण्याचे पाप सुरू केले असून यामुळे भविष्यात सर्वसामान्य लोक मतदानाकडे पाठ फिरवतील व हुकूमशाही अस्तित्वात येण्याची भीती असल्याची टीका ॲड.अनिल केसरकर यांनी केली आहे. पक्षासाठी तन मन व धन अर्पण करून काम करणारे कार्यकर्ते सत्तेच्या राजकारणात बाजूला फेकले जात असून फक्त पैसा फेकून आपण निवडून येवू शकतो हा नवा राजकीय ट्रेंड आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे असा आरोप ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे.
दोडामार्ग दि.२७ दोडामार्ग तालुक्यातील पंचायत समितीच्या कोलझर मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाल्याने तालुक्याच्या राजकारणात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. भाजप–शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक रिंगणात प्रवेश केला होता.त्यांच्या विरोधात सुरुवातीला ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी तसेच काही अपक्ष उमेदवार असे एकूण ५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आज, दि. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने मोठा राजकीय बदल घडून आला. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी गणेशप्रसाद गवस यांच्या विरोधात उभे असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तसेच अवघी काही मिनिट शिल्लक असताना उबाठाचे उमेदवार प्रवीण परब यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि श्री. गवस बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले.
सावंतवाडी दि २७ :सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. यामध्ये भाजपला एकीकडे बिनविरोध विजयाचा आनंद मिळाला असला, तरी दुसरीकडे अनेक मतदारसंघांत स्वकीयांच्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.शेर्ले गणात भाजपचा श्रीगणेशा: महेश धुरी बिनविरोधसावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद चे बांदा मधील भारतीय जनता पार्टीचे प्रमोद कामत हे यापूर्वीच बिनविरोध झालेले आहेत. आणि आजसावंतवाडी पंचायत समितीच्या शेर्ले निर्वाचन गणामध्ये भारतीय जनता पार्टीने आपले खाते उघडले आहे. भाजपचे उमेदवार महेश मोहन धुरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले अपक्ष उमेदवार जगन्नाथ धुरी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने महेश धुरी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.४८ जणांची माघार; भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना थेट लढत१७ जागांसाठी पंचायत समिती आणि आठ जागांसाठी जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे यासाठी तालुक्यात आज एकूण ४८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ५३ जण रिंगणात उतरले आहेत. बहुतांश ठिकाणी आता भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडी (उद्धव ठाकरे शिवसेना) असा तिरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. मात्र, काही महत्त्वाच्या मतदारसंघांत अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी राजकीय समीकरणे कठीण केली आहेत.बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी वाढलीअनेक मतदारसंघांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध स्वकीयांनीच शड्डू ठोकल्याने चुरस वाढली आहे कोलगाव जि.प. मतदारसंघात भाजपमध्ये उघड बंडखोरी झाली आहे. अधिकृत उमेदवार महेश सारंग यांच्या विरोधात नुकतेच ठाकरे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले मायकल डिसोझा यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला असून, त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.इन्सुली जि.प. मतदारसंघात भाजपचे स्वागत नाटेकर यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने येथे तिरंगी लढत होत आहे, ज्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तांबोळी पं.स. मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या अर्चना पांगम यांनी बंडखोरी केल्याने महायुतीसमोर आव्हान उभे राहिले आहे. आंबोली जिल्हा परिषदेमध्ये शिंदे शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सामना होत असल्याने महायुती पूर्णतः अपयशी ठरली आहे या मतदारसंघांमध्ये शोभा गावडे या भारतीय जनता पार्टी पक्षामधून देऊ नका आहेत तर शिंदे शिवसेनेच्या सुप्रिया दिनेश गावडे या सुद्धा रिंगणात आहेत तर अपक्ष उमेदवार सेजल सदाशिव नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तळवडे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये भाजपचे संदीप गावडे त्यांच्याविरुद्ध ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ हे रिंगणात आहेत तर या मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार गंगाराम पै हे रिंगणात आहे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.सावंतवाडीत एका बाजूला बिनविरोध निवडीचा उत्साह असताना, दुसऱ्या बाजूला बंडखोरीमुळे होणारी मतविभाजन थोपवण्याचे मोठे आव्हान भाजप आणि महायुतीसमोर असणार आहे.
या ठिकाणी रंगणार ‘तिहेरी’ थरार
माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत समझोता न झाल्याने खालील ठिकाणी तिरंगी लढती निश्चित झाल्या आहेत
:मळेवाड पंचायत समिती,सातार्डा पंचायत समिती,तांबोळी पंचायत समिती
सावंतवाडी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीनंतर नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले सध्या रजेवर असल्याने पालिकेचा कारभार नेमका कोणाच्या हाती आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. उपनगराध्यक्ष अॅड. निरवडेकर यांच्याकडे प्रत्यक्ष चार्ज दिला आहे का, याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी पत्रकार परिषदेत केला. शहरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, उभाबाजार परिसरात अनेक घरांत गेल्या तीन दिवसांपासून पाणी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण स्वच्छता आणि नगरसेवकांचा संपर्क नसल्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत, या कालावधीत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
सिंधुदुर्ग दि.२७: कोकणच्या लाल मातीतील लोकसंस्कृती आणि देवभक्तीचा अनोखा संगम म्हणजे येथील ‘गावरहाटी’. गोव्यापासून रत्नागिरीपर्यंत पसरलेल्या या बारापाच देवस्थानच्या जत्रोत्सवांना कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमेपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि शिस्तीचा एक पुरातन नमुना म्हणून या जत्रोत्सवांकडे पाहिले जाते. याबाबतची माहिती मळगाव येथील देवस्थानची जाणकार शामसुंदर राऊळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे.गावरहाटीची त्रिसूत्री आणि सामाजिक संरचना कोकणातील ग्रामरचनेत ‘बारापाच’ देवस्थानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधिभौतिक, आधिदैविक आणि आधिआध्यात्मिक ताळमेळ राखण्यासाठी ही व्यवस्था पूर्वापार चालत आली आहे. यामध्ये राजसत्ता, पूर्वसत्ता, कुळकर, स्थळकर आणि भूमीचा मूळ मालक महार अशा पाच महत्त्वाच्या घटकांचा समन्वय असतो. श्री देव रवळनाथ हे या बारापाच देवस्थानचे ‘राजसत्ताप्रमुख’ मानले जातात.
शिस्त आणि सीमांचे अनोखे समीकरण कोकणातील जत्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे गावागावांतील परस्पर समन्वय. एका गावात रवळनाथाची जत्रा असताना, त्याच्या सीमेला लागून असलेल्या दुसऱ्या गावात त्याच वेळी जत्रा नसते. इतकेच नव्हे, तर शेजारच्या गावात उत्सव सुरू असताना सीमेवरील गावकरी आपल्या देवाचा ‘प्रसाद’ किंवा ‘कौल’ लावत नाहीत. “आज देवाचे सुकृत तत्व शेजारच्या गावी गेले आहे,” अशी यामागची उदात्त भावना असते.
वेंगुर्ले येथे सोमवती अमावास्येला होणारे समुद्रस्नान असो किंवा मळगाव-सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीची प्रसिद्ध ‘लोटांगण’ जत्रा, या सर्व ठिकाणी शिस्तीचे पालन काटेकोरपणे केले जाते. जोपर्यंत स्थानिक मुख्य देवतांचे स्नान होत नाही, तोपर्यंत इतर गावांतील तरंग किंवा पालख्या समुद्रात प्रवेश करत नाहीत.
दशावतार: जत्रांचे मुख्य आकर्षण कोकणी जत्रेचा प्राण म्हणजे ‘दशावतार’ नाट्य. श्रीगणेश पूजन आणि शंकासुर वधाच्या कथानकाने सुरू होणारे हे नाटक उत्तरार्धात रामायण-महाभारतातील आख्यानांनी रंगते. पालखी प्रदक्षिणा, झांज-मृदंगाचा ताल आणि शार्दूलविक्रीडित श्लोकांच्या गजरात होणारा हा उत्सव भक्तांना मंत्रमुग्ध करतो.
शेकडो वर्षांची अखंड परंपरा आदिलशाही, निजामशाही आणि इंग्रज राजवटीतही ही गावरहाटी आणि त्यातील नीतिमत्ता तसूभरही ढळली नाही. “कोकणपुराधिनाथ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव रवळनाथाप्रती असलेली ही श्रद्धा आजही कोकणी माणसाला एकत्र बांधून ठेवते. वर्षातून एकदा होणाऱ्या या जत्रेत नारळ आणि पाच केळी अर्पण करून कृतकृत्य होणारा कोकणी माणूस, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली ही संस्कृती आजही तितक्याच निष्ठेने जपत आहे.